जामखेड -शहरात काल झालेल्या जोरदार पावसाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मराठी मुले या शाळेच्या इमारतची पडझड झाली. सध्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्यामुळे सुदैवाने कोणतीहीही जीवितहानी झाली नाही. इमारत दुरुस्तीसाठी शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग, लोकप्रतिनिधींनी याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
काल रात्रीच्या सुमारास शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसात येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या इमारतीचा काही भाग ढासळला. या शाळेचा एकूण पट 405 इतका असून एकूण 14 तुकड्या आहेत. सध्या शाळेच्या 18 खोल्या असून सर्वच्या सर्व खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. या संपूर्ण इमारतीचे निर्लेखन मागील वर्षी मंजूर केले गेले आहे. परंतु नवीन इमारती अभावी सर्व विद्यार्थ्यांना नाविलाजास्तव याच इमारतीत बसावे लागते. मागील वर्षी पावसाळ्यातच जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या खोल्यांची वादळी वाऱ्याने पडझड झाली. त्यामुळे इमारत निर्लेखन करून पाडण्यात आली होती. या शाळेतील 365 विद्यार्थिनीदेखील दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मराठी मुले यांच्या याच धोकादायक इमारतीत बसत आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली यांच्या नवीन इमारतीसंबंधी ग्रामस्थ मागील वर्षी माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे गेले. वर्षभर पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी जिल्हा नियोजनमधून मंजूर केल्याबाबतचे घोषित केले होते. परंतु त्याबाबतही मागील वर्षी कुठलीच कारवाई झाली नाही. त्यानंतर निवडणुका झाल्या व नवीन विद्यमान आमदार रोहित पवार यांनीही शाळेच्या परिसरात भेट देऊन शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याचे कबूल केले होते. परंतु त्यांच्याकडेही वेळोवेळी पाठपुरावा करून शाळेच्या इमारतीच्या प्रश्न अद्याप सुटलेला नाही. मागील वर्षी प्रशासनाने मुलींच्या शाळेची बसण्याची तात्पुरती सोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मराठी मुले यांच्या इमारतीत केली. परंतु ही इमारत धोकादायक असल्याने व कोणत्याही क्षणी ती इमारत ढासळू शकते अशी स्थिती असल्याने या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना कोठे बसवायचे, हा प्रश्न शाळेसमोर उपस्थित झाला आहे.
गेल्या वर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात जामखेडमधील प्रसिद्ध उद्योजक रमेश गुगळे यांनी शाळेला तीन वर्गखोल्या स्वखर्चाने बांधून देणार असल्याचे घोषित केले होते. परंतु तेही काम अद्याप चालू झालेली नाही. जर कोणतीही दुर्घटना झाली आणि यामध्ये मुलांच्या जीवाला काही बरेवाईट झाल्यास याला कोणाला जबाबदार धरायचे, असा प्रश्न पालक विचारत आहेत. जामखेड शहरातील कोणीही लोकप्रतिनिधी या प्रश्नाचा गांभीर्याने पाठपुरावा करत नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे.
शिवाय शाळा व्यवस्थापन समितीने पाठवलेल्या प्रस्तावावर विचार करण्यात आला नाही. परंतु शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या इमारतीकडे शिक्षण विभागाने लक्ष देऊन बांधकामाच्या प्रस्तावाची दखल घेण्यात यावी व येथील शाळेच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.