नवी दिल्ली – देशातील 15 ते 29 वयोगटातील तरुणांच्या बेकारीचा दर 2020-21 मध्ये कमी होऊन 12.9 टक्के झाला असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत दिली. ते म्हणाले की, 2017-18 मध्ये हा बेकारीचा दर 17.8% इतका होता. देशातील कामाची गरज असलेल्या तरुणांची संख्या उपलब्ध व्हावी याकरिता 2017-18 पासून केंद्रीय सांख्यिकी विभाग ही आकडेवारी जमा करीत आहे. त्या आकडेवारीच्या आधारावर ही माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाचा रोजगार निर्मिती वाढावी याकरिता केंद्र सरकार मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया, डिजिटल इंडिया, हाऊसिंग फॉर ऑल योजना राबविण्यात आहे. आगामी काळातही केंद्र सरकारचा रोजगार निर्मितीवर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात रोजगार निर्मिती व्हावी याकरिता केंद्र सरकारने उत्पादन आधारित अनुदान योजना सुरू केली आहे.
या योजनेला देशातील आणि परदेशातील उद्योगानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. भारतात विविध क्षेत्रातील उत्पादन वाढत आहे. यामुळे केवळ देशातील गरज भागणार नाही तर निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात उत्पादन आधारीत अनुदान योजनेतील क्षेत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली. केंद्र सरकारने भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगण्यात आलेत.