पिंपरी, दि. 21 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या जलदिंडी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापालिका, पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आता रिव्हर पोलीस हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. पवना नदीच्या उगमापासूनच्या 42 किलोमीटर अंतरापैकी खालुंब्रे ते दापोडी दरम्यानच्या 24 किलोमीटर नदी पात्रातील पाणी बीओडी आणि सीओडीमुळे वापरण्याजोगे राहिले नाही. त्यासाठी शहरातील 18 महाविद्यालयांना प्रत्येकी दोन-दोन किलोमीटर नदी पात्राची स्वच्छता, देखभाल, प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे दायित्व सोपविण्यात येणार आहे. ग्रामस्थ देखील सहभागी होणार असलेल्या या उपक्रमाला 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरुवात होणार आहे.
याबाबतची माहिती जलदिंडी प्रतिष्ठानचे ओंकार गौरीधर, राजीव भावसार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. जलदिंडीने महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्या सहकार्याने नदी पोलीस ही संकल्पना 2019 मध्येच सुरू करण्याचे निश्चित केले होते. करोनामुळे ते लांबणीवर पडले. नोव्हेंबरपासून या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. शहरातील 24 महाविद्यालये, 35 शाळांमध्ये 150 यशस्वी जागरूकता सत्रे आणि मोहिमा केल्या. आतापर्यंत 18 महाविद्यालयांमधून 54 संघ (प्रत्येकी 10 सदस्यांसह) तयार करण्यात आले आहेत. पवना नदीचे उगमापासून दापोडीपर्यंत 42 किलोमीटर अंतर आहे. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) आणि केमिकल ऑक्सिजन डिंमाड (सीओडी) या घटकांमुळे खालुंब्रे ते दापोडी दरम्यानचे 24 किलोमीटर नदी पात्रातील पाणी वापरण्याजोगे राहिले नाही.
18 महाविद्यालयांना प्रत्येकी दोन-दोन किलोमीटर नदी पात्राची स्वच्छता, देखभाल, उपाययोजना करण्याचे दायित्व सोपविले जाणार आहे. नदीचे पात्र दुषित होत चालले आहे. त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, कशा पद्धतीने केल्या पाहिजेत याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.