मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आत्मदहनचा प्रयत्न केला होता. त्यांना या प्रकरणी अटक आणि सुटका देखील करण्यात आली. त्यांच्या या आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. तर सत्ताधारी पक्षातील नेते गुलाबराव पाटील यांनी तुपकरांच्या आंदोलनाला नौटंकी म्हणत टीका केली होती. दरम्यान, त्यांच्या या टीकेला आता रविकांत तुपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“शेतकऱ्यांचं हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे. आंदोलनाचे अनेक मार्ग आहे. आपणही आंदोलनं केली. पण, हे नौटंकी आंदोलन आपल्याला पसंत नाही,” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली होती. त्यांच्या या विधानावर आता रविकांत तुपकर यांनी बोलताना, “पोलिसांना ज्यांनी आमच्या अंगावर पाठवलं, त्यांच्या खुर्च्या येणाऱ्या काळात काढून घेतल्याशिवाय राहणार नाही; हा शेतकऱ्यांचा निर्धार आहे. खेटायचं असेल, रविकांत तुपकरशी मैदानात खेटावं. पोलिसांच्या आडून खेटू नये.” असे म्हटले आहे.
“गुलाबराव पाटील आंदोलनाला नौटंकी म्हणत आहे. पण, गुलाबराव पाटीलांच्या भाषणात एक डायलॉग असतो, तो म्हणजे, ‘कतलीया कही कात बदल लेते हे, पुण्य के आड मे पाप बदलते है, पर कई लोग अपने बाप बदल लेते है’ अन् गुलाबराव पाटील गुवाहाटीला गेले. ते सांगतात मी नौटंकी आहे. मग गुवाहाटीला काय शेण खायला गेले होते का?,” असा खोचक सवाल रविकांत तुपकर यांनी विचारला.
“विरोधी पक्षात असताना गुलाबराव पाटील यांनीही आंदोलन केली. पान टपरी चालवत असताना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी तुम्हाला मंत्री केले. त्यांच्याशी तुम्ही बेईमानी आणि गद्दारी केली. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दुसरों के घरो पर पत्थर नहीं फेका करते’. तुम्ही ठाकरे घराण्याचे झाले नाही, तुम्ही आम्हाला शिकवता का? योग्यवेळी गुलाबराव पाटलांना उत्तर देणार,” असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.