नवी दिल्ली – आपण अजुनही करोनाच्या दुसऱ्या लाटेतच आहोत. करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सावधगिरी आवश्यक आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सण आहेत. त्यावेळी आपल्याला विशेष दक्षता घ्यावी लागेल. कारण सणांच्या काळातच करोनाचे रूग्ण वाढतात.
आपण दोन लाटा अनुभवल्या आहेत. आजही 46 हजार 164 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 58 टक्के एकट्या केरळ राज्यातील आहेत. देशात 41 जिल्हे असे आहेत की जेथे रोज शंभरपेक्षा जास्त रूग्ण आढळत असल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की सक्रिया बाधितांची संख्या घटते आहे. रिकव्हरी रेटही 97 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मात्र एका राज्यात 1 लाखापेक्षा जास्त सक्रिय बाधित आहेत. चार राज्यांत दहा हजार ते 1 लाखपर्यंत सक्रिय बाधित आहेत तर 31 राज्यांमध्ये दहा हजारपेक्षा कमी सक्रिय बाधित आहेत. केरळमधील सातत्याने वाढत्या संख्येबाबत ते म्हणाले की आम्ही केरळला गेलो होतो.
आरोग्य मंत्रीही तेव्हा होते. पहिली गोष्ट म्हणजे चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आवश्यक आहे. सणांच्या काळात विशेष खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे आणि सगळ्यांत महत्वाचे केरळमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. त्यांना लसीचे जादा डोस देण्याची आमची तयारी आहे.