नवी दिल्ली – औषधांबाबत दिशाभूल करणारी जाहीरात करत तुम्ही लोकांच्या जीवशी खेळत आहात, असे फटकारत पतंजली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले. तसेच आम्ही आंधळे नाही असे नमूद करत आणि माफीनामा स्वीकारण्यास नकार देत योगगुरू रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना धारेवर धरले.
पतंजली दिशाभूल करणारी जाहिरात प्रकरणात ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर वाचून दाखवले, ज्यात त्यांनी जाहिरातीच्या मुद्द्यावर बिनशर्त माफी मागतो असे म्हटले होते.
त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणाले, ‘माफी फक्त कागदोपत्री आहे. आम्ही याला जाणीवपूर्वक आदेशाचे उल्लंघन मानतो. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होता कामा नये, हा संदेश समाजात गेला पाहिजे, असे नमूद केले. तसेच पतंजलीचे प्रमुख रामदेव यांनी परदेश प्रवासाचे खोटे दावे करून न्यायालयासमोर वैयक्तिक हजेरी टाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत फटकारले.
याआधीही सर्वोच्च न्यायालयाने योगगुरू रामदेव आणि पतंजली आयुर्वेदाचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांची सुनावणी घेतली आहे. योग्य प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याने आणि नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल न्यायालयाने दोघांना फटकारले आणि या प्रकरणात तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करायला हवे होते, असे म्हटले होते.
पतंजली आणि आचार्य बाळकृष्ण यांनी न्यायालयाच्या नोटीसला उत्तर दिले नाही आणि ही पूर्ण अवहेलना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. केवळ सर्वोच्च न्यायालयच नाही तर देशभरातील न्यायालयांनी दिलेल्या प्रत्येक आदेशाचा आदर केला पाहिजे. या प्रकरणी तुम्ही प्रतिज्ञापत्र दाखल करायला हवे होते.
कोर्टाने सांगितले होते की, कोर्टात दिलेल्या आश्वासनांचे पालन करावे लागेल. न्यायालयाने केंद्र सरकारवरही प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जेव्हा पतंजली शहरात कोविडवर ॲलोपॅथीमध्ये उपचार नसल्याचे सांगत होते, तेव्हा केंद्राने डोळे मिटून राहण्याचा निर्णय का घेतला?