आळंदी -आज पालखी सोहळ्याची पायी वारी पूर्ववत असती, तर सोहळा खंडेरायाच्या सोन्याच्या जेजुरीत विसावला असता; परंतु करोनाच्या महामारीमुळे सलग दोन वर्षे आषाढी वैद्य दशमीला राज्य परिवहन महामंडळाच्या लाल परीतून पंढरीकडे एक दिवसात मार्गस्थ होतो आहे.
2 जुलै रोजी माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा झाला. तेव्हापासून माऊलींच्या चल पादुका ह्या माऊलीच्या आजोळ घरीच तब्बल 19 दिवस मुक्कामी ठेवण्यात आल्या आहेत.
त्यानिमित्त पालखी सासवडच्या पहिल्या मुक्कामी ते वाखरीच्या अखेरच्या मुक्कामापर्यंत असेपर्यंत आळंदीतील माऊली मंदिरात आजोळ घरी नियमित आळंदी ग्रामस्थ, मानकरी, सेवेकरी यांच्यासाठी नियमित कोणी ना कोणीतरी अन्नदाता अन्नदान दररोज दुपारी 12 ते 2 या कालावधीत करीत आहे.
आज येथील जनक कुमार अमृतलाल जोशी परिवाराने अन्नदान केले. प्रथम जेजुरीच्या खंडेरायाच्या भंडाऱ्याची उधळण करीत सर्व अन्नदात्यांच्या कपाळी भंडारा लावून मिष्ठान्न देण्यात आले.
आज पहाटेपासून माऊलींच्या चल पादुकांना पवमान अभिषेक, दूध आरती, जागरण असे विविध धार्मिक कार्यक्रम गांधी कुटुंबीयांच्या वतीने पार पडले. आजचा माऊलींच्या पादुकांचा सहावा मुक्काम आजोळ घरी असून,
आणखी बारा दिवस पादुका याच ठिकाणी मुक्कामी असणार असल्याचे व्यवस्थांचे प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
माऊली मंदिर (आजोळ घर) गेली सहा दिवसांपासून माऊलींच्या चल पादुका या ठिकाणी असून नियमित विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.