पिंपरी, (प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, एक थोर विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकनेते होते. देशाला आणि मुख्यत्वे महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर कसे नेता येईल, याचा विचार त्यांनी केला. राजकारणाप्रमाणे त्यांना साहित्य, कला, समाजकारण या विषयांमध्येही विशेष रस होता. त्यांच्या व्यापक सामाजिक विचारांचा वारसा यापुढेही जोपासला गेला पाहिजे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
भारताचे माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती महापालिकेच्या वतीने साजरी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत तसेच वल्लभनगर एसटी स्टॅन्ड जवळील आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी अभयचंद्र दादेवार, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी केंद्रात महत्वाची पदे सांभाळली. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांना मिळाला. महाराष्ट्रातील कृषी, औद्योगिक क्षेत्रात विकासाचा पाया रोवण्याची महत्वपुर्ण कामगिरी त्यांनी केली असून एक उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती, असेही जगताप यावेळी म्हणाले.