कारखाना बंदमुळे वेतन रखडल्याने आर्थिक अडचणी; प्रश्न न्यायालयात प्रलंबीत
लोणी काळभोर- थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत कारखाना सुरू करण्याबाबतचा निर्णय झालेला नाही त्यातच गेली चार ते पाच वर्षांपासूनचे काखान्यांच्या कामगारांचेही वेतनही रखडल्याने शेकडो कुटुंब आजही हलाखीचे जीवन जगत आहेत. यावेळी कारखाना सुरू होवून वेतन मिळेल, अशी आशा होती. परंतु, राजकाणाच्या धामुधमीत हा प्रश्न रखडल्याने कामगारांना यंदाची दिवाळीही कडूच जाणार असल्याची चिन्हं आहेत.
राजकारणातून यशवंत कारखाना सुरू करण्यासंदर्भातील प्रक्रिया रखडली आहे. यातूच कामगारांच्या थकीत वेतनाचाही प्रश्न सुटलेला नाही. यामुळे कामगारांकडून संताप व्यक्त होत आहे. साखर विक्री करून आलेल्या रकमेमधून कामगारांची देणी द्यावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र, त्यानंतर याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झालेली नाही.
यशवंत सहकारी साखर कारखाना बंद असल्याने कामगारांचे वेतन रखडले आहे. याकरिता कामगारांनी वेळोवेळी संबंधीत प्रशासनाकडे पाठपुरावा करीत कुटुंबीयांसह मोर्चा, उपोषण व धरणे आंदोलनही केले आहेत. तरीही याबाबत कुठलाच निर्णय झालेला नाही. “यशवंत’च्या कामगारांचे चार ते पाच वर्षांचे वेतन मिळालेले नाही. यशंवत कारखाना बंद पडल्यानंतर त्यावेळी उपलब्ध साखर विक्रीतून आलेल्या रकमेतून हे वेतन अदा करण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. वेतन मिळत नसल्याने कामगार व त्यांचे कुटुंबिय आजही हलाखीचे जीवन जगत आहेत.
यासंदर्भात कामगारांनी कामगार आयुक्तालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर आयुक्तांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना महसूल वसुलीअंतर्गत “यशवंत’कडे शिल्लक असलेला साखर कारखाना जप्त करून सदर साखरेची लिलाव पद्धतीने विक्री करावी, असा आदेश दिला होता. या आदेशान्वये दि. 26 फेब्रुवारी 2012 रोजी 82092 क्वींटल साखर हवेलीचे तत्कालीन तहसीलदार संदेश शिर्के, तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक पाटील, तत्कालीन मंडलअधिकारी विद्याधर सातव यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. यामधून अबकारी कर वगळता सुमारे 20 कोटी रुपये उपलब्ध झाले होते. सदर रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार हवेली तहसिलदारांच्या नावे बॅंक खात्यात जमा करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालीन तहसिलदार शिर्के यांनी कारखान्याकडे कामगारांना देण्यासाठी 11 कोटी 5 लाख 44 हजार 925 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला होता, यातून कामगारांना काही रक्कम अदा करण्यात आली. परंतु, त्यानंतरही कामगारांचे काही वर्षांचे वेतन अद्यापही थकीतच असल्याने याबाबतचा पाठपुरावा कामगारांच्या मार्फत केला जात आहे.
- यशवंत कारखान्याच्या कामगारांच्या थकीत वेतन प्रश्नावर कामगार संघटनेच्या वतीने उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली आहे. याबाबतीच प्रक्रिया सुरू आहे. कामगारांना न्याय मिळावा या भावनेतून आम्ही सर्व जण प्रयत्न करीत आहोत. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय मिळेल, अशी अशा आहे.
– तात्यासाहेब काळे, अध्यक्ष, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, पुणे