शिल्पा रसाळ
प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ, बेटी बचाव-बेटी पढाव या चळवळीच्या आद्य प्रणेत्या, मनस्वी कवयित्री, सिद्धहस्त लेखिका, नृत्यांगना, उत्तम वक्ता, साईबन ते मधुबन या संकल्पनेची निर्माती, राजयोगा मेडिटेशनची प्रचारक व प्रसारक हे सारं नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा प्रकाश कांकरिया या एकाच व्यक्तीच्या ठायी एकटवलेले आहे.
सुधाताई या प्रसिद्ध पत्रकार नागनाथ व सिंधुताई फटाले यांच्या सुकन्या. डॉ. प्रकाश कांकरिया यांच्याशी त्या 1982 मध्ये विवाहबद्ध झाल्यावर नगरकर झाल्या. नेत्रतज्ज्ञ म्हणून काम करताना त्यांचा महिला पेशंटशी संबंध आला. मुली, महिलांवर नेत्रोपचार करताना सहाजिकच गप्पा व्हायच्या. 1985 च्या नेत्रतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टीसला प्रारंभ केल्यावर सुधाताईंकडे 21 ते 23 वर्षांची तरुणी उपचारासाठी आली. तिला मोतीबिंदू झाला होता. सुधाताईंनी तिच्यावर उपचार केल्यावर तिला स्वच्छ दृष्टी मिळाली. मात्र, तरीही ती उदास होती. सुधाताईंनी तिला तुझं ऑपरेशन यशस्वी झाले आहे. तू उदास का? असा प्रश्न केल्यावर ती तरुणी रडायला लागली. तिने आपण मुलगी म्हणून जन्माला आलो, याचे घरात सर्वांनाच वाईट वाटते. घरात आपण नकोशी होतो. लग्नानंतरही तिला दुसऱ्यांदा मुलगी होणार हे समजल्यावर सासरच्यांनी तिला गरोदर असताना ढकलून दिले. तिच्या डोक्याला पलंगाचा कोपरा लागला. डोळ्याला ईजा झाली आणि मोतीबिंदू झाल्याचे तिने सांगितले.
तिच्या या व्यथेने सुधाताईंच्या काळजात चर्रर्र झाले. मुलगी जन्माला येणे व जन्माला घालणे यात तिचा दोष काय? सुधाताईंचे विचार चक्र सुरू झाले. त्यातूनच “सेव्ह गर्ल चाईल्ड’, “बेटी बचाव-बेटी पढाव’ या संकल्पनेचा जन्म झाला. आज ही राष्ट्रीय चळवळ बनली आहे. “स्त्री जन्माचे स्वागत करा’ हा उपक्रम त्यांनी 12 हजारांपेक्षा अधिक कार्यशाळा घेवून खेडोपाडी पोहोचविला. अधिक प्रभावीपणे हा उपक्रम राबविण्यासाठी स्वसिद्धा प्रकल्प आणि 11 कलमी कृती कार्यक्रमाची जोडत्याला दिली.
आठवा फेराः लग्नामध्ये सप्तपदी हा विवाह संस्काराचा भाग असतो. सुधाताईंनी आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा अशी अभिनव कल्पना मांडली. आज 10 हजारपेक्षा जास्त जोडप्यांनी ही शपथ घेतली. याचबरोबर सुधाताईंनी सामूहिक डोहाळजवण ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. गरोदर महिलांशी व त्यांच्या कुटुंबियांशी सुसंवाद साधत स्त्री जन्माच्या स्वागतासाठी त्यांची मनोभूमिका तयार केली. आरोग्य मंत्रालयाने आठवा फेरा घेण्यासाठी सूचना दिल्या. हरियाणा सरकारनेही याची दखल घेत आठव्या फेऱ्यासाठी अनुदान दिले.
नकोशीला करू या हवीशी – ही गोष्ट आहे 2005 मधली. सुधाताई साताऱ्याला गेल्या होत्या. तिथे त्यांना मुलीचे नावच “नकोशी’ असल्याचे समजले. सुधाताईंनी लगेचच नकोशी नाव असलेल्या मुलींचा शोध घेतला. एकाच वेळी सातारा जिल्ह्यात 273 मुलींची नावे नकोशी असल्याची माहिती समोर आली. सुधाताईंनी या 273 जणींचे एकाच वेळी नामकरण केले. अर्थात, त्यासाठी विविध पातळ्यांवर त्यांना समुपदेशन करावे लागले. एका आशा हेल्थ वर्कसचे नाव नकोशी होती. सुधाताईंनी तिचे नामकरण भाग्यश्री केले. आशा हेल्थ उपवर मुलींच्या चष्म्याचा नंबर कमी करणे, चष्मा घालवणे ही योजना आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू केली. आजही याचा लाभ भारतभरातील मुली घेत आहेत.
- मेडीटेशन – प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाशी सुधाताईंचा स्नेहबंध आहे. राजयोगा मेडीटेशनद्वारे करोना काळात त्यांनी करोना बाधितांना हिलिंग दिले, त्यांचे समुपदेशन केले. हा ग्रुप नंतर ऑनलाईनही सुरू होता. ध्यानधारणा आणि प्राणायम म्हणजे ईश्वराशी तादात्म्य पावणे होय यावर सुधाताईंचा विश्वास आहे.
- नृत्यांगना – 1998 मध्ये सुधाताईंनी पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत असा सतत 12 तासांचा कुचिपुडी नृत्याचा विक्रम प्रस्थापित केला. सुप्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांच्या सन्मान्य उपस्थितीत या उपक्रमाची सांगता झाली. सुधाताईंनी कुचिपुडी, भरतनाट्यमसाठी नृत्यतिलका ऍवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.
- सामुहिक शपथ – दरवर्षी स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) व गणराज्यदिनी (26 जानेवारी) स्त्री भ्रूणहत्या रोखू या, स्त्री जन्माचे स्वागत करू या, बेटी, बचाव, बेटी पढाव या विषयी सामूहिक शपथ दिली जाते. या चळवळीत त्यांनी विविध सामाजिक संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था, नगरपरिषद, महापालिका, ग्रामसभा, पतसंस्था, बचतगट, शाळा, महाविद्यालये यांना जोडून घेत ही चळवळ सर्वदूर पोहोचविली.
- टपाल तिकीट – सुधाताईंच्या या सामाजिक कार्याची दखल टपाल खात्यानेही घेतली. नुकतेच त्यांची छबी असलेले पाच रुपयांचे तिकीट टपाल खात्याने काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
- विवाह दृष्टी भेट – उपवर मुलीला चष्मा असेल, तर तिच्या चष्म्याचा नंबर जास्त असेल, तर लग्न जमण्यात अडथळे येतात. समाजातील या दाहकतेने अस्वस्थ झालेल्या सुधाताईंनी उपवर मुलींसाठी विवाह दृष्टी भेट निवारण योजना तयार केली याचा अनेक युवतींनी लाभ घेतला.
- पुरस्कार – 2007 मध्ये तत्कलिन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांच्या हस्ते त्यांना निर्मलग्राम पुरस्कार प्रदान केला गेला. 2008 मध्ये तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या सुधाताईंच्या जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. युरोप येथील युर्निव्हरसिटी ऑफ माऊंटन्सच्या वतीने वुमन एक्सलन्स ऍवॉर्डने त्यांचा गौरव झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल, रमेश बैस यांच्या हस्ते सुधाताईंना नॅशनल ऍवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाईल्ड मिशन इन इंडिया सन्मान प्राप्त झाला. त्यांनी विविध पुस्तकांचे लेखनही केले आहे. डॉ.सुधाताईंचा दिवस पहाटे 3 वाजता सुरू होतो. पहाटे 3.45 ते 4.45 या वेळात अमृतवेळा मेडिरेशन असते. यात 100 व्यक्तींचा सहभाग असतो. सकाळी 6 ते 7 मुरली क्लास असतो. यात परमपित्याच्या महावाक्यांचे वाचन व स्पष्टीकरण असते. 7 वा त्या फिरायला जातात. 7.30 ते 8.30 प्राणायम झाल्यावर नाष्टा करून 11 ते 5.30 या वेळेत हॉस्पिटलमध्ये नेत्रोपचार देतात. रोज सायं. 6 ते 7 मौन पाळतात. 7 नंतर सामाजकि कामात व्यस्त असतात. रात्री 10 वाजता निद्राधीन होतात. या सर्व कार्यात पती नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया, पुत्र डॉ. वर्धमान व स्नूषा डॉ. श्रृतिका, दोन्ही नाती यांचा पूर्ण पाठिंबा सुधाताईंना आहे. माझे कुटुंब ही माझी प्रेरणा आहे, असे त्या अभिमानाने सांगतात. सुधाताई म्हणजे समाजकार्याचा, समाजसेवेचा मेरुमणी ठरल्या आहेत. नगरकरांना त्यांचा सार्थ अभिमान आहे.
स्त्री जन्माचे स्वागत रेकॉर्ड
स्त्री जन्माचे स्वागत या सुधाताईंच्या चळवळीची वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. बेटी बचाव चळवळीच्या त्या आद्य वर्करला हाताशी धरून सुधाताईंनी तुमच्या गावात नकोशी, निराशा, फशीबाई, कडूबाई, खड्डी या नावाच्या मुली, महिला आढळल्या, तर मला कळवा म्हणत मोहिम राबविली. आज नकोशी असलेल्या 1200 ते 1500 मुलींचे, महिलांचे नामकरण त्यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.
एक रुपयांची जादू
कन्या जन्माचा आनंद सोहळा व्हावा. यासाठी सुधाताईंनी गावोगावी ग्रामसभेतही संकल्पना मांडली. प्रत्येक गावकऱ्याने एक रुपया द्यायचा. छोट्या लोकवस्तीच्या गावातून दोन हजार रुपये जमा झाले. त्यातून नवाजात कन्येकरिता झबलं, टोपडं व अन्य आवश्यक सामानाची खरेदी करण्यात येते. कन्या जन्माचा आनंद सोळला सारे गाव साजरे करते. हीच संकल्पनानंतर सुधाताईंनी शाळा-शाळांतील पालकसभेत आणि महाविद्यालयीन पातळीवरही मांडली. एन. सी. सी., एन. एस. एस.च्या विद्यार्थ्यांचे सहकार्य याकरिता घेतले.