मुंबई -कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या लढतीत तुफानी फलंदाजीने मोहित करणारा राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल लवकरच भारतीय संघात खेळताना दिसेल. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीच हे संकेत दिल्यामुळे लवकरच जयस्वालसाठी भारतीय संघाची दारे खुली होणार आहेत.
आयपील स्पर्धेत कोलकाता विरुद्ध झालेल्या लढतीत जयस्वालने अवघ्या 13 चेंडूत अर्धशतक साकार करताना स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक साकार करण्याचा विक्रम केला. नंतर त्याला या सामन्यात फारशी स्ट्राईक मिळाली नाही व तो 98 धावांवरच नाबाद राहिला व त्याचे विक्रमी शतक अवघ्या 2 धावांनी हुकले.
मात्र, तरीही राजस्थानने त्याच्या खेळीच्या जोरावर कोलकाताचा 14 व्या षटकातच पराभव केला. या खेळीने केवळ चाहतेच आनंदित झाले असे नाही तर बीसीसीआयचे सचिव जय शहा हे देखील प्रभावीत झाले व त्यांनी लगेचच जयस्वाल इंडिया मटेरियल असल्याचे ट्विट केले.
जयस्वालने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत 12 डावात 575 धावा केल्या असून त्यात 4 अर्धशतके व 1 शतक आहे. जय शहा यांच्या ट्विटवर रवी शास्त्री यांनीही प्रतिक्रिया दिली असून जयस्वालची भारतीय संघात दाखल होत अशीच अफलातून कामगिरी करण्याची वेळ जवळ आली आहे, असे म्हटले आहे.