नवी दिल्ली -जंतरमंतरवर आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता वेगळे वळण लागत असल्याची चिन्हे दिसत आहेत. या कुस्तीपटूंपैकी काही खेळाडूंना अज्ञात व्यक्तींकडून मारहाण झाल्याचा दावाही आता या कुस्तीपटूंनी केला आहे. राजधानीतील एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कुस्तीपटूंची भेट घेतली व त्यांना पाठिंबा देण्याची तयारीही दर्शवली.
मात्र, या खेळाडूंनी संघटनेच्या लोकांना तेथून निघून जाण्यास सांगितले. त्याच म्हणजे मंगळवारच्या रात्री आंदोलनाला बसलेल्यांपैकी काही खेळाडूंनी अज्ञात व्यक्तींकडून मारहाण झाली, असा दावा स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने केला आहे.
दिल्लीतील एका प्रसिद्ध गुरुद्वारापासून ते जंतरमंतरपासून तसे लांब असलेल्या एका हनुमान मंदिरापर्यंत या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी मोर्चाही काढला होता. या मोर्चाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत मोठा होता. एकाच ठिकाणी बसून आंदोलन करत राहण्याबरोबरच आता थेट लोकांशी संपर्क साधून या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी कुस्तीपटूंनी कंबर कसली आहे,
त्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आल्याचे ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने म्हटले आहे. दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्रालय व केंद्र सरकार आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना यांना या कुस्तीपटूंनी येत्या रविवारची (21 मे) मुदत दिली असून तोपर्यंत सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर वेगळा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही दिला आहे.
दरम्यान, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या बारा खेळाडूंच्या जबाबानंतर दुसऱ्या टप्प्यातही काही खेळाडूंचे जबाब नोंदवण्यात यणार आहेत. मात्र, प्रत्येक खेळाडूला वेगवेगळे बोलवले जात असल्याने आंदोलनातील कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे. सगळ्यांनाच एकत्र बोलावले गेले तरच खेळाडू कोणतीही भीती न बाळगता बोलतील. आता जी मुदत दिली आहे, त्यापूर्वी जर जबाब नोंदवून घेणार असतील तर आम्ही एकत्रच जाणार, असेही हे कुस्तीपटू म्हणत आहेत.
आंदोलन रामलिला मैदानावर हलवणार नाही
भीम आर्मीची अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी जंतरमंतरवर या कुस्तीपटूंची भेट घेतली व त्यांना हे आंदोलन रामलिला मैदानावर हलवण्याची सूचना केली. तसेच संघटना तुम्हा सगळ्यांना पाठिंबा देईल असे अश्वासनही दिले. मात्र, हे आंदोलन जंतरमंतरवरच सुरू राहणार असल्याचे कुस्तीपटूंनी त्यांना ठामपणे सांगितले आहे.