पुणे -“डोळे’ या शब्दाभोवती सगळे जगच फिरते. “ते नसते तर….’ ही कल्पना ज्यांच्याकडे दृष्टी आहे ते करूच शकत नाहीत कारण ती कल्पनाच भितीदायक वाटते. परंतु जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांना हे जग कसे दिसते याची थोडीशी देखील कल्पना नाही, याचे कारण त्यांचे अंधत्त्व आहे. याच अंध:कारमय जगाला प्रकाशमान करण्यासाठी, दृष्टी देण्यासाठी आणि नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 10 जून हा दिवस “जागतिक दृष्टीदान दिवस’ (वर्ल्ड आय डोनेशन डे) म्हणून साजरा केला जातो.
जगात सुमारे 2.2 अब्ज लोकांना दृष्टीदोष आहे. भारतात अंधत्त्वाचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 1.99 टक्के आहे. त्यातील प्रमुख कारणांमध्ये मोतीबिंदू 66.2 टक्के कॉर्नियल अपारदर्शकता 8.2 टक्के, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत 7.2 टक्के त्यानंतर होणारे विकार किंवा इन्फेक्शनने आलेले अंधत्त्व 5.9 टक्के काचबिंदू 5.5 टक्के आहे. तर नेत्रदानाचे प्रमाण देशात सुमारे 70 हजार इतके आहे. मात्र, अंधांच्या तुलनेत त्याची संख्या कमी आहे. त्यामुळे नेत्रदानाविषयी अधिक जागृती होणे आवश्यक आहे.
कॉर्नियाचा रोग मुख्य कारण…
मृत्यूनंतरही “नेत्ररुपी उरावे’ यासाठी लोकांना प्रेरित करणे हा या दिवसाचा उद्देश्य आहे. अंधत्व ही विकसनशील देशांमधील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. “वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या मते, मोतीबिंदू आणि काचबिंदूनंतर कॉर्नियाचा रोग (डोळ्याचा पुढचा थर असलेल्या कॉर्नियाचे नुकसान) दृष्टी कमी होणे आणि अंधत्व येण्याचे एक प्रमुख कारण आहे.
कसे होते नेत्रसंकलन
नेत्रदानाची इच्छा व्यक्त केलेली व्यक्ती मृत पावली आणि त्यांच्या नातेवाईकांनी कळवले तर हे नेत्रसंकलन घरी, रुग्णालयात, स्मशानभूमीत वा इतरत्रही करण्यात येते. एमबीबीएस नोंदणीकृत डॉक्टरच नेत्रसंकलन करू शकतात. यासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागतो. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यादीही नेत्रपेढीकडे तयार असते. बुबुळ बाटलीत 48 तासांपर्यंत ठेवता येतात. तसेच इतर विशेष रसायनांमध्ये ते बुबुळ दोन ते तीन ते आठवड्यांपर्यंत सुरक्षित ठेवता येतात. बुबुळ प्रत्यारोपित व्यक्तीला याबाबत काहीही माहिती देण्यात येत नाही. मृत्युपूर्व नेत्रदानाचा संकल्प नसला तरीही मृतांच्या जवळील नातेवाईकही संमती देऊ शकतात.
एड्सग्रस्त वगळता कोणीही करू शकतो नेत्रदान
नेत्रदान करताना अनेक समज गैरसमज असतात. परंतु एक वर्षांच्या बालकांपासून ते कितीही वर्षापर्यंतच्या व्यक्तीला, चष्मा घालणारे, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती, मधुमेही आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीही डोळे दान करू शकतात. एड्स आणि गंभीर रक्तदोष (कावीळ आदी) असणाऱ्या व्यक्तींशिवाय अन्य सर्व आजाराने ग्रस्त लोक नेत्रदान करू शकतात.