पुणे – महापालिकेकडून शहरातील पाणी नियोजनासाठी वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातून सिंहगड रस्ता आणि कात्रज भागात सोमवार ते रविवारपर्यंत दरारोज वेगवेगळ्या भागात पाणी पुरवठा केला जातो. मात्र, सोमवारी शहरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा येत आहे. या वारी सोहळ्यातील बहुतांश दिंड्या विठ्ठलवाडी, हिंगणे (खुर्द), माणिकबाग, सनसिटी रस्ता, वडगाव परिसरात मुक्कामी असतात.
या शिवाय, प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल मंदीरही असून या मंदीरातही हजारो वारकरी दर्शनासाठी येतात. मात्र, सोमवारीच पाणी बंद असल्याने भाविक तसेच वारकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे सोमवार तसेच मंगळवार या दोन्ही दिवशीचा पाणी बंद या आठवड्यात रद्द करावा, अशी मागणी माजी नगरसेविका मंजूषा नागपूरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
दिंड्यांसाठी पाण्याची गरज…
सिंहगड रस्ता परिसरात अनेक दिंड्या मुक्कामी असतात, दिंडीत असलेल्या वारकऱ्यांना दैनंदिन वापरासाठी पाण्याची गरज भासते, अशा स्थितीत पाणी बंद असल्याने तसेच शहरात पालखी सोहळा असल्याने टॅंकरचे पाणी मिळण्यासाठीही अडचणीत येतात, अशा स्थितीत पाणी नसल्यास वारकऱ्यांची अडचण होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन हा पाणी बंद मागे घ्यावा, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.