ICC Cricket World Cup 2023 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मायदेशात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफलातून कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या साखळी फेरीतील सर्व 9 सामने जिंकत संघाने थेट उपांत्य फेरीत स्थान मिळवले.
सध्या टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या साखळी टप्प्यातील नऊपैकी 8 सामने हे जवळपास एकतर्फी जिंकले आहेत. यामध्ये फक्त फलंदाजांनीच नव्हे तर गोलंदाजांनी देखील अप्रतिम अशी शानदार कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
फलंदाजी ही नेहमीच टीम इंडियाची ताकद राहिली आहे, पण या विश्वचषकात टीम इंडियाची गोलंदाजी पाहिल्यानंतर जगभरातील क्रिकेट दिग्गजांचा असा विश्वास आहे की यावेळी भारताची गोलंदाजी ही जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजी आहे.
दरम्यान, ही कामगिरी पाहता एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत यंदाच्या मोसमात जीतके संघ सहभागी झालेले आहेत त्यात भारतीय संघाचीच गोलंदाजी सर्वात भेदक व धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन याने देखील दिली आहे.
पुढे तो म्हणाला की, पूर्वी 2000 सालापर्यंत भारताची फलंदाजी सर्वात बलाढ्य मानली जात होती. त्यांच्या सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण व वीरेंदर सेहवाग असे फॅब फाईव्ह त्यांच्याकडे होते.आता जसप्रीत बुमराह, महंमद शमी, महंमद सिराज, कुलदीप यादव व रवींद्र जडेजा ही त्यांची गोलंदाजी आज जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम मानली जाते, असेही हुसेन म्हणाला.
दरम्यान,या वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराहने 17, मोहम्मद शमीने 16, रवींद्र जडेजाने 16, कुलदीप यादवने 14 आणि मोहम्मद सिराजने 12 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच टीम इंडियाच्या या पाच गोलंदाजांनी मिळून आतापर्यंत एकूण 75 विकेट घेतल्या आहेत. यावरून असे दिसून येते की यावेळी टीम इंडिया कोणा एका गोलंदाजावर अवलंबून नसून सर्व गोलंदाजांवर अवलंबून आहे.