वडूज -आगामी काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत खटाव व माण तालुक्यांतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. गट, गणनिहाय बैठका घेऊन सर्वांनुमते उमेदवारांची निवड केली जाईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सातेवाडी (ता. खटाव) येथील मधुमाला सांस्कृतिक कार्यालयात खटाव तालुक्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रा. अर्जुनराव खाडे, प्रा. बंडा गोडसे, आशाताई बरकडे, बाळासाहेब माने, हणमंतराव शिंदे, प्रा. एस. पी. देशमुख, पृथ्वीराज गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. देशमुख म्हणाले, “”ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकीत झालेले मतभेद कार्यकर्त्यांनी दूर ठेवावेत. पक्ष हाच आपला विचार मानून तळागाळातील लोकापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवावीत. गेल्या दोन वर्षांत करोना काळात पक्ष व पदाधिकाऱ्यांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवावे. सामान्य माणसाचे हित लक्षात घेऊन सामाजिक प्रश्नांकडे कार्यकत्यांनी लक्ष द्यावे. 2009 नंतर तालुक्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे.
दहशत व पैशांचा वापर करून घराघरांत व समाजात फूट पाडली जात आहे. ही परिस्थिती थांबविण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे.” एकसंघपणे काम करून राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष मोरे, प्रा. खाडे, प्रा. गोडसे, प्रा. देशमुख, श्री. माने, श्री. शिंदे आदींनी केले. बैठकीस दाऊद मुल्ला, विजय खाडे, प्रा. राम साळुंखे, डॉ. संतोष देशमुख, डॉ. महेश माने, ज्ञानेश्वर शिंदे, सदाशिव बागल, योगेश जाधव, सौ. प्रमिला पाटोळे, राजेंद्र फडतरे, डॉ. प्रकाश पाटोळे, अक्षय फडतरे, ऍड. रोहन जाधव, प्रताप देशमुख, खुदबुद्दिन शिकलगार, सुनील नेटके, सोमनाथ साठे, डॉ. आकाराम बोडके, शशिकांत देशमुख, निसार मुल्ला, नवनाथ देशमुख, संभाजी पवार, पोपट पाटील, तानाजी बागल आदी मान्यवर तसेच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार संजय राऊत यांच्यावर ईडी कडून करण्यात आलेल्या कारवाईचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल पवार यांनी आभार मानले.