आंबेगाव बुद्रुक – पुणे शहरातून जाणाऱ्या मुंबई महामार्गावर भीषण अपघातासह दररोज छोटे-मोठे अपघातही घडत आहेत. हा महामार्ग ज्या परिसरातून गेला आहे तेथील सर्व्हिस रस्त्यांच्या रूंदीकरणाचे काम गेली कित्येक वर्षे अर्धवट राहिले आहे. यामुळे अशा रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी महामार्गावर एकाचवेळी येत असल्याने गर्दीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सर्व्हिस रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे ठरत आहे.
कात्रजवरून बाह्यवळण मार्गासह पर्यायी मार्ग म्हणून कात्रज नवीन बोगदा मार्गे वाहतूक वळवण्यात आली. परंतु, या मार्गाच्या सर्व्हिस रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहनांची गर्दी महामार्गावरच होत आहे. लोकप्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा करून सदर रस्त्यांसाठी मोठा निधी मंजूर करून आणला. मात्र, गेली तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये या रस्त्याचे सहादरीकरणाचे काम सुरूच असून सर्व्हिस रस्तेही पूर्ण तयार झालेले नाहीत. परिणामी, या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी मुख्य मार्गावर जात आहे.
आंबेगावला जोडणारा दत्तनगर येथील राजमाता भुयारी मार्ग वाढत्या लोकसंखेमुळे कमी पडू लागला आहे. त्या ठिकाणी जोडून नवीन भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे सहापदीरीकरण कामाला गती आली असताना सेवा रस्ते मात्र अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट झाले आहेत.
सदर सेवा रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवर आपण वारंवार कारवाई करीत असतो. परंतु, तरीही कोणी वाहने उभी केली असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईङ. यासंदर्भात पोलीस पथकांची मिटींग घेऊन तशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत.
– प्रशांत कणसे, पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ वाहतूक विभाग