विश्रांतवाडी – खराडीमधील यशवंत नगर, पंढरीनगर परिसरात हिरवट व पिवळसर पिण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने या दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भातील वारंवार तक्रार करूनही समस्या सुटलेली नाही. दूषित पाणीपुरवठा होत असल्याने यशवंतनगर येथील संतप्त नागरिक व महिलांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. दूषित पाणी येत असल्याची तक्रार माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांच्याकडे केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार मनपाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी आले असता मनपाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी दूषित पाण्याची बाटलीही भेट दिली.
माजी नगरसेवक पठारे यांनी या नागरिकांसह बंडगार्डन पाणीपुरवठा विभाग, जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाणीपुरवठा अधिकारी नितीन जाधव आणि वाघमारे यांना धारेवर धरले. गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार करूनही पालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन लहान मुलांना पोटाच्या आणि त्वचेच्या समस्या उद्भवत आहेत.
महापालिका प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी व जलवाहिनीची पाहणी करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, असे निवेदन माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जुबेदा सय्यद, रेखा मसराम, कमल फलके, सविता लगड, स्वाती काळे, लता तांबडे, सोनू बांगर, लता रोकडे, जिजाबाई जाधव, स्वप्नील पठारे, किरण खैरे, चेतन येवले, राजेश आबनावे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.