सातारा -हद्दवाढीसह कास धरणाचे उंची वाढवण्याच्या कामाचा भाग असलेल्या कास- बामणोली रत्यावरील पूल बांधण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने 50 लाखांचा निधी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे धनादेशाव्दारे वर्ग केला आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी या कामासाठी सातत्याने निधी आणि अनुषंगिक बाबींचा पाठपुरावा केल्यामुळेच वेळोवेळी शासनाकडून आवश्यक तो निधी आणि विविध मंजुऱ्या मिळाल्या.
कास धरणाच्या राहिलेल्या 30 टक्के कामास येत्या आठ दिवसांत सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती जलमंदिर पॅलेस येथील सूत्रांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. कोणताही उपसा खर्च न करता कास धरणातून सुमारे 140 वर्षापासून सातारा शहराला शुध्द आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा अव्याहतपणे होत आहे.
मातीचे पक्क्या धरणामधून ग्रॅव्हिटीने सुमारे 24 किलोमीटर अंतराच्या उघडया पाटाने सुरुवातीस आणि सुमारे 25 वर्षापासून बंदिस्त पाईपलाईनव्दारे कास धरणातून पाणीपुरवठा होत आहे.
या धरणाची उंची वाढवल्यास बिनखर्चाने अहोरात्र वाहणारे पाणी लक्षात घेऊन सातारची 2040 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन कास धरणाची उंची वाढवण्याचे विकास काम सर्वप्रथम उदयनराजे भोसले यांनी प्रस्तावित केले. त्यासाठी लागणाऱ्या सर्व मंजुऱ्या, आवश्यक निधी याकरीता सातत्याने त्यांनी पाठपुरावा केला. त्यामुळेच सुमारे 70 टक्के काम पूर्णत्वाकडे गेले आहे.
कास धरणाची उंची वाढवल्याने सध्याच्या सुमारे 107 दशलक्ष घनफूट इतक्या पाणीसाठ्याऐवजी सुमारे 500 दशलक्ष घनफूट पाणीसाठा ग्रॅव्हिटी सिस्टिमव्दारे उपलब्ध होणार आहे. त्याकरीता कोणताही उपसा खर्च न होता वाढीव हद्दीसह सातारा शहराकरीता मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. ही मोठी उपलब्धी उदयनराजे भोसले यांच्यामुळेच निर्माण झाली.
कास धरणाची उंची वाढवल्याने सध्याच्या कास- बामणेलीकडे जाणारा रस्ता पाण्याच्या फुगवट्याने बाधित होणार असल्याने नवीन पर्यायी रस्त्यावर उंच पूल बांधण्यासाठी उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 50 लाख रुपयांचा निधी वर्ग केला आहे. कास धरणाची उंची वाढवण्याचे उर्वरित कामास आठ दिवसांत सुरुवात करण्यात येईल आणि पुढील मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उदयनराजे भोसले यांचे नियोजन आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.