हजारीबाग : आज महिला निर्भयपणे घराबाहेर पाऊल टाकता येत नाही. भाजपा सरकारकडे महिलांच्या मुद्द्यावर कोणतेही धोरण नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.
आज जग भारताकडे बलात्काराची राजधानी म्हणून पहात आहे. उत्तर प्रदेशनध्ये आमदार एका महिलेवर बलात्कार करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर ब्रही काढत नाहीत, अशी तोफही त्यांनी डागली.
झारखंडमधील निवडणुकीच्या प्रचारसभेत राहूल गांधी हजारीबाग जिल्ह्यातील बरकागाव येथे बोलत होते. सामुहिक बलत्कार करून हत्या करण्याच्या दोन घटनांनी देश ढवळून निघाला असताना राहूल यांनी केलेल्या या विधानाला महत्व आले आहे.
महिलांबाबत केंद्र सरकारचे सुसंगत धोरण नाही. त्यांना सुरक्षित वातावरण देण्यात केंद्र सरकार अयशस्वी ठरले. महिला अुरक्षित असताना देशात असे भयानक प्रकार घडत असताना पंतप्रधान त्यावर काहीही बोलत नाहीत हे वाईट आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
राष्ट्रीय जनता दल आणि झरखंड मुक्ती मोर्चा यांच्याशी आघाडी करून कॉंग्रेस निवडणूक लढवत आहे. या आघाडीसमोर भाजपाचे आव्हान आहे. मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे.