लातूर – औसा तालुक्यातील भादा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या 45 गावांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. यामुळे 45 गावातील महिला, अपंग, पुरुष, युवक, युवतींनी देशी दारूच्या बाटल्या व डोक्यावर टोपलीत कोंबड्या घेऊन भादा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या मांडला.
यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दारुमुळे कुटुंबाची राखरांगोळी होत असल्याचा संताप व्यक्त केला. काहींनी दारूच्या नादात शेती विकली तर महिला व मुलांना मारहाण हा नेहमीचा भाग आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत 45 गावात अवैधपणे देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री होते. या अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस प्रशासनाकडून हप्ते घेऊन संरक्षण दिले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
वर्षाकाठी सरासरी 50 लोकांचा यात जीव जातो, त्यावर अवलंबून असणारे 250 व्यक्ती यांचे देखील जीवन उद्वस्त होते. एक महिन्याच्या आत सर्व अवैध धंदे बंद करावेत, जे पोलीस या दारूविक्रीला अभय देतात अशांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अवैध दारूविक्री बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला आहे.