धारणात् धर्म इत्याहुः
धर्मेण विधृताः प्रजाः।
यः स्यात् धारणसंयुक्तः
स धर्म इति निश्चयः।।
(महाभारत शांतीपर्व 109)
जो समाजाची धारणा करतो तो धर्म असे महाभारतकारांनी म्हटले आहे. समाजाच्या सर्व व्यवस्था सुरळीतपणे चालाव्यात याची व्यवस्था भारतीय परंपरेत धर्माच्या रूपाने केलेली दिसून येते.
हिंदू धर्म-संस्कृतीचा एक विशेष म्हणजे संस्कार. मनुष्याच्या जन्माच्या आधीपासून ते त्याच्या मृत्यूनंतरही केले जाणारे वैविध्यपूर्ण संस्कार भारतीय परंपरेत वैदिक कालापासून प्रचलित आहेत. या संस्कारविधींचे मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यकता असते पौरोहिताची. वैदिक कालापासून धार्मिक क्षेत्रात स्त्रिया आणि पुरुष यांनी अशा धार्मिक मार्गदर्शनाची, पौरोहित्याची जबाबदारी सांभाळलेली दिसते.
पुरोहित या शब्दाचा अर्थ आहे अग्रभागी उभा असलेला. जो समाजाच्या अग्रभागी उभा आहे त्याचा अर्थ जो समाजाला अभ्यासपूर्वक मार्गदर्शन करीत आहे अशी व्यक्ती म्हणजे पुरोहित! ऋग्वेदात अग्नीला पुरोहित हे विशेषण दिलेले आहे. पुरोहित युद्धामध्ये सैन्याच्या पुढे उभा राहात असे व आपल्या सैन्याला विजय मिळावा म्हणून प्रार्थना करीत असे. राज्यकारभारातही पुरोहिताचा सल्ला महत्त्वाचा मानला जाई. यज्ञयागादी धर्मकृत्यांमध्ये मंत्रपठण करणे व त्या अनुषंगाने कृतींचे मार्गदर्शन करणे हे पुरोहिताचे काम असे. वयं राष्ट्रेजागृयाम पुरोहिताः। ही पुरोहितांची महत्त्वाची उद्घोषणा होती. (शुक्ल यजुर्वेद 9.23)संशितं मे ब्रह्म संशितं वीर्यं बलम्। संशितं क्षत्रं जिष्णु यस्याहमस्मि पुरोहितः।। (शुक्ल यजुर्वेद 11-81) शास्त्रशुद्ध आचरणाने मी माझे ब्रह्मतेज अत्यंत तीक्ष्ण व कडकडीत राखले आहे. मी माझे शरीरसामर्थ्य व इंद्रियांच्या शक्ती कार्यक्षम ठेवल्या आहेत. ज्या राजाचा मी पुरोहित आहे त्याचे क्षात्र मी वृद्धिंगत केले आहे.अन्य संस्कृती आणि परंपरात केवळ पुरुषांनाच असा पुरोहितपदाचा अधिकार दिलेला दिसतो. मात्र, हिंदू परंपरेत पुरोहितपदाचा अधिकार हा स्त्री आणि पुरुष दोघांनाही दिला आहे. त्याचा इतिहास असा-हिंदू परंपरेचे अधिष्ठान असणाऱ्या वैदिक साहित्यातील ऋग्वेदात स्त्रियांनी रचलेल्या सूक्तांचा समावेश आहे ही उल्लेखनीय बाब आहे. वैदिक काळात मुलाइतकेच मुलीच्याही शिक्षणाला प्राधान्य दिले जात असे. त्यांच्याही अभ्यासाची सुरुवात उपनयन संस्काराने होत असे. त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केला जात असे. कन्यांचे उपनयन झाल्यावर त्या गुरूगृही राहून वेदाध्ययन करीत असत.
ब्रह्मचर्याचे पालन करून अध्ययन पूर्ण करणाऱ्या कन्येला सुयोग्य वराची प्राप्ती होते असे अथर्ववेदात म्हटले आहे. ऋषिका जुहू ही बृहस्पितीची पत्नी होती. प्रमादामुळे त्याने पत्नीचा त्याग केला होता. तथापि, वैदिक संहितांचे अध्ययन-अध्यापन करून तिने स्वतःचे जीवन व्यतीत केले होते. विश्वावरा आत्रेयी हिने स्वतः यज्ञाचे पौरोहित्य केले व अन्य स्त्रियांनाही तसे करण्याचा उपदेश केला. अग्नीची पूजा करण्यास तत्पर आणि विद्वानांचे स्वागत करणाऱ्या विश्वावरेला यज्ञकर्ती म्हणून संबोधिले आहे.
ब्राह्ममकाळात यज्ञ हा वैदिक धर्माचा मेरुदंड मानला जाई. कौषीतकी ब्राह्मणात पथ्यास्वस्ती ही स्त्री उत्तरेकडचा खडतर प्रवास करून अध्ययन करते व तिच्या पारंगतेबद्दल वाच ही उच्च पदवी मिळविते असा संदर्भ दिसतो. व्याकरणकार पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथात तसेच महाभाष्यातही उल्लेख आढळतात की काही स्त्रिया आचार्य या नात्याने अध्यापनही करीत असत.
गार्गी व मैत्रेयी यांच्या कथा बृह्दारण्यक उपनिषदात आल्या आहेत. कात्यायनी व मैत्रेयी या याज्ञवल्क्य ऋषींच्या दोघी पत्नी. कात्यायनीला प्रामुख्याने गृहकृत्याची आवड होती तर मैत्रेयी ही ब्रह्मवादिनी होती. याज्ञवल्क्यांनी संन्यास घेण्यापूर्वी मैत्रेयीला तिच्या इच्छेनुसार ब्रह्मज्ञान दिले. पृथ्वीवरील वैभवापेक्षा अमरत्वाचे ज्ञान मैत्रेयीला अधिक महत्त्वाचे वाटले.
विदेह देशाच्या राजा जनकाने बहुदक्षिण यज्ञ केला व आवाहन केले की, सर्वश्रेष्ठ ब्रह्मज्ञानी ब्राह्मणाने शिंगांना सोने बांधलेल्या एक हजार गाई न्याव्यात. याज्ञवल्क्य ऋषींनी पुढाकार घेतल्यावर अन्य ब्राह्मणांनी त्यांच्याशी शास्त्रचर्चा केली; परंतु याज्ञवल्क्य ऋषींनी त्यांना निरुत्तर केले. त्यानंतर गार्गी वाचन्कवी पुढे आली आणि तिने याज्ञवल्क्य ऋषींशी शास्त्रचर्चा केली. गार्गी मर्यादेचे उल्लंघन करून प्रश्न विचारते आहे असे मानून याज्ञवल्क्य ऋषींनी तिला धमकी दिली की तुझे मस्तक गळून पडेल, पण गार्गीला त्याचे भय वाटले नाही. आपल्याला धमकी देऊन आपल्याशी असभ्यपणे वर्तन करण्याऱ्या याज्ञवल्क्य ऋषींना गार्गीने ब्रह्मज्ञानी म्हणून घोषित केलेले दिसते. ज्याप्रमाणे पुरुष ब्रह्मचारी राहून तप, स्वाध्याय, योग इ. द्वारे ब्रह्मणपद प्राप्त करीत असत त्याप्रमाणे स्त्रियाही परमार्थाची वाटचाल करीत असत.
रामायण काळातील स्त्रियांना धर्मशिक्षण दिले जात असे. सीता, कौसल्या, तारा, वेदवती, स्वयंप्रभा यांना वैदिक शिक्षण दिले गेले होते. सीतेचे उपनयन झाले असून ती सायंसंध्या करीत असल्याचे उल्लेख सापडतात. श्रीराम व लक्ष्मण यांना विश्वामित्रांबरोबर पाठविण्यापूर्वी कौसल्येने त्यांचे स्वस्त्ययन केले होते. वालीची पत्नी तारा ही मंत्रविद् म्हणून ओळखली जात असे.
मतंग मुनींच्या आश्रमात राहून ज्ञानार्जन करणारी शबरी सर्वांना परिचित आहे. महाभारतातील सुलभा-जनक संवाद प्रसिद्ध आहे. सुलभा ही एक कुमारी संन्यासिनी असून प्रधान नावाच्या राजाची कन्या होती. संन्यास आणि योगमार्गाचे आचरण करणाऱ्या विदुषी सुलभेने मिथिलेचा राजा जनक याच्याशी कर्मयोग, गृहस्थाश्रम यासारख्या विषयांवर शास्त्रचर्चा केली आहे. (म.शां. 308) महाभारतातील स्त्रिया स्थालीपाकयज्ञ व त्यासदृश यज्ञ करीत असत. उत्तम स्त्रियांनी पांडव पत्नी द्रौपदीप्रमाणे वेदाध्ययन केले पाहिजे असे महाभारत निर्णय या ग्रंथात सांगितले आहे.
स्कंद पुराणातील प्रभास खंडात सावित्रीचे चरित्र आले आहे तेथेही ती अग्नीला मंत्रपूर्वक आहुती देताना दिसते. येथपर्यंत स्त्रियांच्या धर्मशिक्षणाचे संदर्भ पाहिल्यानंतर स्त्रियांच्या सामाजिक स्थानाविषयी समजून घेणे औचित्याचे ठरेल.
शिक्षणाच्या अधिकारामुळे स्वतःला ब्रह्मपदी नेण्याचा अधिकार असलेल्या स्त्रीच्या सामाजिक अधःपतनाला उत्तर वैदिक काळात सुरुवात झालेली दिसते. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद यांनीही महिलांना धार्मिक कृत्यांमध्ये पौरोहित्य करण्याचे अधिकार दिलेले दिसतात. स्त्रियांनी धर्माच्या क्षेत्रात कार्यरत राहून समाजाला आपले योगदान द्यावे, अशी शक्यता कै. शंकर मामा थत्ते यांनी निर्माण केली. महिलांना पौरोहित्याचे प्रशिक्षण देण्याचे वर्ग त्यांनी उद्यान प्रसाद कार्यालय येथे सुरू केले. त्याच जोडीने पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेनेही सर्व जाती-जमातीच्या महिलांना पौरोहित्याचे प्रशिक्षण देणे सुरू केले. शिर्डीजवळ साकुरी येथे उपासनी महाराज आणि गोदावरी माता यांनीही महिलांना पौरोहित्याचा अधिकार दिला आहे, शिक्षण दिले आहे. राष्ट्रसेविका समितीने सुद्धा महिलांना पारंपरिक पद्धतीने पौरोहित्य प्रशिक्षण दिले. या सर्व ठिकाणी महिला प्रशिक्षण घेत असून आजही त्या समाजात आपल्या कार्याचा ठसा उमटवीत आहेत. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी महिला पुरोहिता सेवा करीत असल्याचा अनुभव विशेष उल्लेखनीय आहे.
समाजाला धार्मिक कृत्यात मार्गदर्शन करणाऱ्या स्त्रियांना आज समाजात आदराचे स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये स्त्री पुरोहिताना आदराचे स्थान मिळकत असले तरी अद्याप सर्वदूर ही संकल्पना स्वीकारली गेली असे नाही. त्यामुळे या विषयावर अभ्यासपूर्ण जाणीव जागृती होणे ही बदलत्या काळाची आवश्यकता आहे.
महती
डॉ. आर्या जोशी