– माधव विद्वांस
श्रेष्ठ नाटककार, नाट्यगीतकार, लेखक, पत्रकार, संपादक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म सांगली येथे 23 नोव्हेंबर 1872 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण सांगली येथे, महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे फर्गसन आणि डेक्कन महाविद्यालयांमध्ये झाले. त्यानंतर मुंबईस कायद्याचा अभ्यास करून एलएलबी झाले. वर्ष 1892-94 या दरम्यान ते सांगली हायस्कूलमध्ये शिक्षक होते. वर्ष 1893 पासून त्यांनी लेखनाचा श्रीगणेशा केला. “सवाई माधवराव यांचा मृत्यू’ या पहिल्या नाटकाचे लेखन केले व विविधज्ञान विस्तारात प्रसिद्ध झाले. त्यातील लेख पाहून लोकमान्य टिळकांची व त्यांची ओळख झाली. वर्ष 1896 मध्ये त्यांनी केसरीत “राष्ट्रीय महोत्सव’ हा लेख लिहिला. वर्ष 1897 मध्ये त्यांनी केसरीत काम सुरू केले.
त्यांनी आपल्या नाट्यलेखनातून प्रखर राजकीय विचारांच्या समर्थनार्थ नाट्यलेखनाचाही वापर सुरू केला. वर्ष 1901 मध्ये “गनिमी काव्याचे युद्ध’ ही लेखमाला लिहिली. वर्ष 1907 मध्ये तिसऱ्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. टिळकांच्या तुरुंगवासाच्या काळात त्यांनी केसरीचे संपादक म्हणून धुरा सांभाळली होती. वर्ष 1910 मध्ये केसरीचे संपादकत्व त्यांनी सोडले. वर्ष 1913 मध्ये बाल्कन युद्धावरील लेखमाला लिहिली. वर्ष 1914 मध्ये चित्रमयजगत या अंकामध्ये पहिल्या महायुद्धावरील लेखमालेस प्रारंभ केला. वर्ष 1918 मध्ये लोकमान्य टिळक व न. चिं. केळकर हे इंग्लंडला गेल्यामुळे केसरीचे संपादकत्व त्यांनी पुन्हा स्वीकारले. वर्ष 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांचा केसरीशी संबंध संपला व ते महात्मा गांधींच्या भूमिकेचे समर्थक बनले. वर्ष 1921 पासून मुंबईत “लोकमान्य’ दैनिकाचे संपादन केले.
वर्ष 1923 मध्ये त्यांनी लोकमान्य दैनिकाचे संपादकत्व सोडले व 1925 मध्ये स्वत:च्या मालकीचे “नवाकाळ’ दैनिक सुरू केले. वर्ष 1927 मध्ये हिंदू-मुस्लीम वादावरील लेखाबद्दल नवाकाळवर खटला होऊन खाडिलकरांना दंडाची शिक्षा झाली. पुन्हा 1929 मध्ये राजद्रोहाचा खटला झाला व एक वर्षाची शिक्षा झाली. वर्ष 1933 मध्ये नागपूर येथे अठराव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. वर्ष 1933-35 या कालावधीमधे सांगलीस दत्तमंदिरात ते योगविषयक प्रवचने देत. 1935-47 मध्ये त्यांनी अध्यात्म-ग्रंथमालेतील पुस्तकांचे लेखन केले.
त्यांनी नाटकांच्या माध्यमातून सद्य राजकीय परिस्थितीचे, पारतंत्र्याबद्दल जनजागृती करण्याचे कामही सुरू केले. “कीचकवध’ नाटकाच्या माध्यमातून कर्झनशाहीचे खरे स्वरूप दाखविणाऱ्या नाटकाच्या प्रयोगावर इंग्रज सरकारने बंदी घातली आणि ते जप्त केले. त्यांनी कांचनगडची मोहना, संगीत बायकांचे बंड, भाऊबंदकी, प्रेमध्वज, संगीत मानापमान, संगीत विद्याहरण, सत्त्वपरीक्षा, संगीत स्वयंवर, संगीत द्रौपदी, संगीत त्रिदंडी संन्यास, संगीत मेनका, सवती-मत्सर आणि संगीत सावित्री अशी एकंदर पंधरा नाटके लिहिली आहेत. त्यांनी एकंदर 67 नाट्यगीते गीते लिहिली. त्यामधे शुरा मी वंदिले, चंद्रिका ही जणू, मला मदन भासे हा, युवतीमना दारुण रण, विराट ज्ञानी कोंदाटला ही गीते खूप गाजली. 27 ऑगस्ट 1948 रोजी त्यांचे निधन झाले.