रेडा – आता राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे व येणारे सरकार देखील महायुतीचे सरकार असल्यामुळे आपले मत वाया न घालवता कमळ चिन्हाला मत देऊन इंदापूर तालुक्यातील गतिमान विकासाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी माळवाडी नंबर 2 सरडेवाडी, कांदलगाव, हिंगणगाव, तरडगाव, बाभूळगाव, बेडसिंगे, गलांडवाडी गावचा दौरा करीत मतदारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मालोजी पाटील, ऋतुजा पाटील, भास्कर पाटील, नितीन शिंदे, कृष्णाजी यादव, नीलेश देवकर, युवा नेते रणजित पाटील यांच्यासह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्यात मागील पाच वर्षांत कोणताही रस्ता, कांदलगाव, महादेवनगर परिसरातील रस्त्यांवर मुरमाची पाटी देखील न टाकता 1300 कोटी निधीचा विकास केला, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्क्रिय आमदार म्हणतात. मग या विकासासाठी निधी आणलेला कुठे गेला, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांचे नाव न घेता केला.
जनतेने सत्तेच्या बाजूने जर कौल दिला तरच दुधाच्या व्यवसायाला, युवकांच्या व महिलांच्या प्रश्नांना न्याय मिळू शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या परिसरातील सर्व गावे कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या विचाराचा वारसा जपणारी आहेत, त्यामुळे प्रत्येक गावातून माताधिक्यांत वाढ दिसली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
गावोगावी जल्लोषात स्वागत
भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचे गाव भेटीदरम्यान गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत करत “हर्षवर्धन पाटलांना मत म्हणजेच विकासाला मत’ अशा प्रतिक्रिया देत भगवे वातावरण करून सोडले आहे.