मुंबई – सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल झालेली अवमानकारक विधाने, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, परराज्यात गेलेले उद्योग, वाढती महागाई, बेरोजगारी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्षाची मागणीअशा अनेक मुद्यांमुळे नागपूर येथे होऊ घातलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन सत्ताधारी पक्षासाठी कसोटीचे ठरणार आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने शनिवारी मुंबईत अभूतपूर्व मोर्चा काढून अधिवेशनात आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. सरकारविरोधात दोन हात करण्याचा विरोधी पक्षांचा निर्धार पाहता विरोधकांकडून रविवारच्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.
#BorderDispute । सीमाप्रश्नी बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेचे विशेष अधिवेशन
करोना संसर्गामुळे सलग दोन वर्षे नागपूरला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होऊ शकले नाही. आता करोनाची साथ नियंत्रणात आल्याने नागपूर अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून अधिवेशनानिमित्त येणारे मंत्री, आमदार, अधिकारी यांच्या स्वागतासाठी संत्रानगरी सज्ज झाली आहे. पोलीस प्रशासनाने विधान मंडळ परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.
#BorderDispute । सीमाप्रश्नी बेळगावमध्ये कर्नाटक विधानसभेचे विशेष अधिवेशन
चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
राज्यविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरमध्ये सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापान कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्याच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक प्रश्नांवरून विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. लाखो कोटीची गुंतवणूक होणार होती. मात्र या सगळ्या गोष्टींना महाराष्ट्र मुकला आहे. विरोधाला विरोध करणारे आम्ही नाहीत. आम्ही चर्चेतून मार्ग काढणारी लोकं आहोत. आम्ही आमदाराचा निधी वाढवला होता. आता सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 7 कोटी निधी करावा. – अजित पवार, विरोधी पक्षनेते