वेल्हे, (प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे झाल्याने शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. हे सर्व होत असताना, राजगडकरांना मात्र नामकरणानंतर तरी दुर्गम व विकासापासून वंचित असलेल्या वेल्हे तालुक्याची ओळख विकसित राजगड तालुका अशी होणार का..? या ठिकाणी दर्जेदार कामे व ऐतिहासिक पर्यटन तालुका म्हणून घोषित होणार का, असा प्रश्न पडला आहे.
अनेक गावांमध्ये साध्या साध्या सुविधाही नागरिकांना मिळत नाहीत, गाव खेड्यांपर्यंत बस वाहनाची व्यवस्था नाही. अनेक शाळांची व आंगणवडी यांची दुरवस्था आहे, एक शिक्षकीच शाळा सर्वत्र आहेत. रस्ते, वीज, पाणी, असे अनेक प्रश्न आजही प्रलंबित असून ते मार्गी लागणे अत्यंत गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांची प्रथम राजधानी असलेल्या किल्ले राजगडाचे नाव पूर्वीच्या वेल्हे तालुक्याला दिल्याचे सार्थक होईल, अशी भावना स्थानिकांनी दैनिक प्रभातशी बोलताना व्यक्त केली.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला व तो खर्चही झाला. परंतु एकही काम दर्जेदार झाले नसल्यामुळे हा निधी पाण्यातच गेल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ही कामे पुन्हा करण्याची वेळ आली असून या सर्व प्रकारात काही राजकीय लोकांबरोबरच प्रामुख्याने प्रशासनातील लोक, ठेकेदार व गावागावात अंतर्गत राजकारण करणारी मंडळी कारणीभूत असल्यामुळे खऱ्या अर्थाने विकासाची गंगा गाव खेड्यांमध्ये पोहोचलीच नाही आणि याचे जिवंत उदाहरण व आता नामकरण झालेला राजगड तालुका असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
भात शेतीसाठी राज्यात प्रसिद्ध असलेला हा तालुका पर्यटकांमुळे कायम गजबजलेला असतो. किल्ले राजगड, तोरणा व मढे घाट याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तो पर्यटन तालुका घोषित केल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. मागील काळात जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले त्यात अनेकांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकल्या गेल्या. त्यात अनेकांनी आपले हात ओले करून घेतले. मात्र, याचा स्थानिकांना कोणताही लाभ झाला नाही. उलट तेच विस्थापित झाल्याचे चित्र तालुक्यात आहे.
खरे तर राजगड तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित केल्याने अनेक युवकांना रोजगार निर्माण होतील. शासनाने या युवक युवतींसाठी विशेष आर्थिक साह्य करणे गरजेचे आहे. तसेच धरण शेत्रातील गेलेल्या जमिनीबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा. -मयूर सस्ते, ग्रामस्थ सस्तेवाडी (वरसगाव धरण शेत्र)
निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो. पण प्रत्यक्ष काम होताना दिसत नाही. छत्रपती शिवराय व त्यांच्या गड किल्ल्यांच्या नावांचा खुबीने वापर केला जातो आणि मतदारांना भुरळ घातली जाते. मात्र, विकास कुठे दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. – संजय लिम्हण, माजी सरपंच, गुंजवणे
राजगड तालुका नामकरणाचे आम्ही स्वागत करतोच मात्र याच बरोबर आमची मुख्य मागणी आहे की, या गडकोटांच्या परिसरातील गावांचा कायमस्वरूपी विकास होणे गरजेचे आहे. सरकारने निधी देताना कामे कशी होतात याकडे लक्ष द्यावे. कारण या भागातील ग्रामपंचायती या छोट्या असून त्यांच्याकडे भरीव कामे करण्यासाठी निधी कमी असतो. निधी उपलब्ध होणारी त्यांच्याकडे दुसरी साधने नाहीत. – किसन रसाळ, माजी सरपंच, चिरमोडी