वीसगाव खोरे (वार्ताहर) – सेंद्रिय व जिवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करून भोर तालुक्यातील बारे खुर्द येथील सौरभ दत्तात्रेय खुटवड या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक भात शेतीला फाटा देत उन्हाळी कलिंगडाची शेती यशस्वी केली आहे. भाटघर पाणलोट क्षेत्रात भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात हमखास नगदी पीक असलेल्या कलिंगडाच्या शेतीचा अभिनव प्रयोग कृषी पदविकेचे शिक्षण घेत असताना यशस्वी करून दाखविला.
सुरुवातीला नांगरट करून रोटावेटर मारून ४ फुटाची सरी पाडली नंतर ठीबकची जोडणी करून मलचिंग पेपर अंथरून ४ फुट बाय १ फुट अंतरावर मेलॉडी या वाणाच्या रोपांची लागण केली. मलचिंग पेपर मुळे तणाचे प्रमाण अल्प राहते,रोपांना ठिबकद्वारे दिली जाणारी खते, किटकनाशके यांचा पुरेपूर वापर रोपांची मुळे करून पीक जोमात येते.
त्याला दर दोन दिवसाला पाणी दिले. लागण केल्यानंतर ६० व्या दिवशी कलिंगड तोडणीस सुरुवात केली. सेंद्रिय शेती करताना सायबेज आशा या संस्थेचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रतिकीलो १४ ते १६ रू भाव मिळत आहे. पहिल्या तोड्याला १२ टन दुसऱ्या तोडायला ४ ते ५ टन फळे निघतील. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्यामुळे, चवीला अधिक गोड, रसाळ, बियांचे अल्प प्रमाण व अधिक काळ टिकत असल्याने फळाला जास्त मागणी आहे. शेतावर येऊन ग्राहक खरेदी करतात.
खत व्यवस्थापन
२५ टक्के कुजलेल्या शेणापासून गांडूळ खत स्वतः घरी तयार करून. एकरी १ टनाचा वापर केला. जीवामृत स्लरी १० किलो गाईचे शेण १० लिटर गोमूत्र २ किलो बेसन पिठ २ किलो काळा गुळ आणि १ मूठ जीवनी असलेली वडाच्या झाडाखालची माती.१८० लिटर पाणी याचे एकत्र मिश्रण करून ८ दिवस हे मिश्रण रापत ठेऊन त्याचा वापर एकरी २०० लिटर प्रमाणे दर ४ दिवसाला त्याचा ठीबकच्या माध्यमातून दिले. लागवडीनंतर पंधरा दिवसांनी जिवामृत, गायीच्या शेणापासून तयार झालेले जिवाणू संवर्धन आदी सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला.
उत्पादन खर्च
कलिंगडाच्या रोपांसाठी ९ हजार,सैंद्रिय खतांसाठी ४ हजार,ठिबक सिंचनासाठी व मलचींग पेपर १५ हजार, मशागत ३ हजार, घरी बनवलेले निमअर्क व दशपर्णी अर्क याचा वापर केल्यामुळे फवारणीचा खर्च वाचला आहे.मजुरीसाठी २ हजार खर्च करण्यात आला आहे.
दशपर्णी अर्काने कीड नियंत्रण
दशपर्णी अर्काची ४ दिवसांनी (५० लीटर गोमुत्र, कडु लिंब,रुई,समदीर सोक, गिरिपुष्प,करंज,निर्गुडी,टनटनी, सीताफळ,लाल कन्हेर,पपई, एरंडाची पाने किलो गुळवेल प्रती २ किलो,तंबाखू पावशेर,हळद पावशेर,आलं,हिरवी मिरची, लसुण यांचे वाटण करून टाकले दोन महिने मुरत ठेवून नंतर हे मिश्रण गाळून घेतले) फवारणी केल्याने कीड नियंत्रणात आली.
घरीच लिंबाचा पाला व शेण गोमूत्र यापासून निम अर्क आणि दशपर्णी अर्क हे घरीच तयार करून त्याचा ४ दिवसाला फवारणी केली. त्याच प्रमाणे मध्ये मध्ये झेंडूची रोपे लाऊन कीड नियंत्रण केले.
कुटुंबाची साथ
सौरभला वडील दत्तात्रय नारायण खुटवड, आई द्रोपदा व मोठा भाऊ अजय आदींची सेंद्रिय शेती कसण्यास मोलाची मदत होते. शेताच्या बांधावर कलिंगडे विकली जात असल्याने वाहतूक,आडत,साठवणूक यांचा खर्च वाचतो. ग्राहकांना रास्त भावात कलिंगडाची विक्री करता येते. लोकांनाही रास्त भावात कलिंगड मिळण्यास मदत झाली आहे.
सेंद्रिय शेती करत असताना खूप शेतकऱ्यांनी भेट दिली. अगदी महाराष्ट्र बाहेरील लोकांनी येऊन भेट दिली. सेंद्रिय शेती करणे काळाची गरज आहे आणि रासायनिक खताचा दुष्परिणाम तर आहेच. पण त्यासाठी होणारा खर्च जास्त आहे. तसेच सेंद्रिय शेतीला लागणारी खते घरीच तयार करता येतात.
त्यामुळे त्याला उत्पादन खर्च जास्त नाही आणि ते शरीराला हानिकारक नाही. मी नोकरी न करता माझ्या घरची १२ एकर शेती ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करत आहे. येणाऱ्या पिढीला असाध्य रोगांपासून दूर ठेवायचे असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे.- सौरभ खुटवड, प्रयोगशील शेतकरी, बारे खुर्द (ता.भोर)