राजगड, (प्रतिनिधी) – तालुक्यातील वेल्हे येथील शेतकरी शिवाजी देवगिरकर यांनी दहा गुंठे क्षेत्रावर पाचशे रोपे मिरची लागवड करून त्यामध्ये एक एक बेड कलिंगड, कारली, वांगी, दोडका, टोमॅटो आणि एक बेड काकडी अशी संमिश्र भाजी पिके घेतली आहेत. यातून त्यांना दररोज हक्काचे उत्पन्न चालू झाले आहे. सध्या त्यांचा मिरचीचा तोडा चालू झाला असून महिन्याला साधारण वीस हजार रुपये मिर्ची तोडीतून मिळत आहेत.
सुरुवातीला त्यांना झालेला एकूण खर्च हा मल्चिंग पेपर, ठिबक पाईप, कॉक व निप्पल, पि. व्हि. सी. पाईप व रोपे, तार, सुतळी, असा एकूण दहा ते बारा हजार रुपये झाला. मजूर न घेता कुटुंबातील माणसांनीच सर्व मशागत करतानाच शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेती व्यवसाय नियोजनबध्द केल्यास नक्कीच फायदा होतो, हे दाखवून दिले.
शिवाजी देवगिरकर व त्यांच्या पत्नी जयश्री देवगिरकर या नेहमी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतानाच मागणीनुसार ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहचविण्याची सुद्धा व्यवस्था करतात. तर अनेक ग्राहक हे राजगड तालुक्यात पर्यटनाला आल्यावर स्वतःहून त्यांच्या शेतात जाऊन भाजीपाला खरेदी करतात.
सुरुवातीचा मिरचीचा पहिला तोडा केला असता तो १२० किलो झाला. वेल्हे बाजार पेठेत भाजी विक्रेत्यांना त्यांनी ७० रुपये किलो दराने त्याची विक्री केली त्यातून त्यांना ८४०० रुपये उत्पन्न मिळाले. शिवाय ही तोड अजून चार ते पाच महिने चालू राहील, असे शिवाजी देवगिरकर यांनी सांगितले अन्य लागवडीचे अजून उत्पन्न चालू होण्यास उशीर असून सरासरी दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असल्याचे देवगिरीकर यांनी सांगितले.
कोट : इतर भाजीपाला पिकांमधून रोज साधारण ५०० ते ७०० रुपये मिळतात. आजूबाजूचे लोक शेतात येऊन भाजी घेऊन जातात. पिकासाठी जीवामृत तयार करून ड्रिपने सोडून देतानाच दशपर्णीची फवारणी, फळमाशी सापळे लावने, सोलर ट्रॅप, ट्रॅप कार्ड, आणि विशेषतः अंडा ताक गुळ संजीवक ठिबकद्वारे सोडण्यात येते. यासाठी आम्ही बोरवेलचा वापर करतो.-शिवाजी देवगिरकर, प्रगतशील शेतकरी
आमचे सहा माणसांचे कुटुंबं आहे आही वर्षाकाठी तांदूळ, गहू, कांदा, सूर्यफूल, गोल्डन वाटाणा, ज्वारी, ही पिके ५२ गुंठे क्षेत्रावर घेतली आहेत. त्याला प्रत्येक तीन वर्षांनी दहा ट्रॉली शेणखत, तिन ट्रॉली लेंडी खत असे वापरतो. त्याचा खर्च साधारण ३५ हजार रुपये इतका तीन वर्षासाठी येतो. तीन वर्षांनी ट्रॅक्टरच्या मोठा पलटी नांगर टाकून व रोटर टाकून शेनखत लेंडी खत मिसळून घेण्यात येते. त्यामुळे जमिनीचा कसदार पणा टिकून राहतो व उत्पन्नात वाढ होते. – जयश्री देवगिरकर