मुंबई – राज्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच परतीच्या पावसाने तर हाहाकार माजवला. अनेक भागात प्रामुख्याने घेतले जाणारे हातातोंडाशी आलेले सोयाबीन पीक परतीच्या पावसाने मातीमोल झाले. सोयाबीन पीकाचे झालेल्या नुकसानीमुळे मराठवाड्यात काही शेतकऱ्यांनी आ’त्महत्या केल्या. विरोधी पक्षांकडून राज्यात ओला दुष्काळ जाही करण्याची मागणी होत आहे. मात्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे म्हंटले आहे. ज्या भागात नुकसान झाले त्या भागाचे पंचनामे करण्यात येणार आहेत. त्यानंतर किती नुकसान झाले हे समजेल, असे सत्तार म्हणाले आहेत.
शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांना “कर्जमाफी’ची दिवाळी भेट; ‘या’ बॅंकेतून घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ https://t.co/BbNDTA35Wf
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 20, 2022
सत्तार म्हणाले की, परतीचा पाऊस यावर्षीच झालाय असे नाही, तो प्रत्येकवेळी पडतो.त्याचा अंदाज लावता येत नाही. आमच्याकडे शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती येतेय. पंचनामे झाल्यावर नुकसानीचा आकडा समजेल, त्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळेल. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासनही सत्तार यांनी दिले आहे. मात्र सध्या सरकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही असे सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुधवारी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे आणि भरपाईचे आदेश दिले आहे.