पुणे – बंगालचा उपसागर आणि आंध्रप्रदेश दक्षिण भाग ते तामिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. त्यामुळे आता राज्यात आगामी दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या “हिक्का’ चक्री वादळाचा वेग वाढल्याने मंगळवारी दुपारनंतर अरबी समुद्रात जोरदार वारे वाहत होते त्यामुळे अरबी समुद्र ही खवळलेला होता. हे वादळ जरी ओमनच्या दिशेने सरकले असले, तरी ते दमनच्या ईशान्यकडे 350 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे कोकण-मुंबईसह घाट माथ्यावर जोरदार पाऊस पडला. हे चक्रीवादळ शमत होत नाही, तोच बंगालच्या उपसागरात चक्रावात निर्माण झाला आहे. तर उत्तर भारतातील आसपासच्या पूर्व भाग राजस्थानच्या ईशान्य ते नैऋत्य भागात चक्राकार स्थिती आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून 3.1ते 7.6 किलोमीटर उंचीवर असल्याने या भागात सध्या जोरदार पाऊस पडत आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशचा दक्षिण भाग आणि उत्तर तामिळनाडू या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे ही स्थिती समुद्रसपाटीपासून साडेपाच किलोमीटर उंचीवर आहे. यामुळे याभागात मुसळधार पाऊस पडत आहे.