मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा अर्थात गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव भारत सरकारने यनेस्कोला सादर केला आहे. 2024-25 या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
या प्रस्तावात किल्ले रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण !
आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. 2024-25 या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 30, 2024
महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या 2024-25 जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादी (World Heritage List) मध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आला आहे.
नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिववारशांचा समावेश असून या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल.