भाजपची महाजनादेश यात्रेची उद्या वरवंड येथे सभा
केडगाव: शनिवार (दि. 14) भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा दौंड तालुक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वरवंड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून, या सभेत धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री काय बोलतात, याकडे तालुक्यातील अवघ्या धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील बांधव अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे, म्हणून लढा देत आहेत. आघाडी सरकारच्या काळात बारामती तालुक्यात फार मोठे जनआंदोलन झाले. या आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळाले होते. याच आंदोलनाला भाजपने “हायजॅक’ करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधील असल्याचे जाहीर केले होतेण सद्यःस्थितित पाच वर्ष उलटूनदेखील आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. आदिवासी समाजाला मिळणाऱ्या काही सवलती धनगर समाजाला लागू करून बोळवण करण्यात आली असली तरी त्या सवलती नेमक्या कोणत्या आणि कश्या राबवल्या जाणार, याबाबत धनगर समाजात संभ्रमावस्था आहे. भाजपची महाजनादेश यात्रा शनिवार (दि. 14) दौंड तालुक्यात दाखल होत असून, वरवंड येथे होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री धनगर समाजाच्या आरक्षणादृष्टीने काही सकारात्मक घोषणा करणार का, याकडे धनगर बांधवांचे लक्ष लागले आहे.