नवी दिल्ली – कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरुद्धचे बंड फसल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची पुढील रणनीती काय असेल याविषयी राजकीय वर्तुळात कमालीची
उत्सुकता होती. पण पायलट यांनी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही, उलट आपण कॉंग्रेसमध्येच राहणार आहोत, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या समर्थक आमदारांनीही कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
अजूनही दिल्लीतच वास्तव्याला असलेले सचिन पायलट हे भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात होते, पण त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की आपण पक्ष सोडणार नाही. भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही कारण आपण त्या पक्षाच्या विरोधात जाहीर प्रचार केला होता व त्यांची सत्ता घालवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले होते असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या राजकीय भवितव्याची रणनीती स्पष्ट करण्यासाठी सचिन पायलट यांनी आज सकाळी दिल्लीत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती, पण ही पत्रकार परिषद त्यांनी अचानक रद्द केली. वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, आपले भाजपशी कनेक्शन नव्हते, गांधी परिवारात आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी पक्षातल्याच लोकांनी हा अपप्रचार केला, असे ते म्हणाले.
दरम्यान, पायलट यांच्या या भूमिकेचे कॉंग्रेससूत्रांकडून स्वागत करण्यात येत आहे. पायलट यांच्याशी खुलेपणाने योग्य वेळी चर्चा केली जाईल, असे संकेतही कॉंग्रेसकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने गेहलोत सरकारला विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करण्याचे आवाहन केले आहे. एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आलेले कॉंग्रेसचे आमदार आता आपापल्या घरी परतू लागले असून त्यांच्यापैकी प्रत्येकाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.