पुणे –टाटा जलविद्युत प्रकल्प समुहातून वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडण्यात येणारे भिमा खोऱ्याचे 42.50 टीएमसी पाणी टप्प्याटप्प्याने कमी करून काही पाणी भिमा खोऱ्यात उपलब्ध करून देता येईल का? याबाबत सुर्वे समिती स्थापन केली आहे. या समितीचा अभ्यास प्रगतीपथावर आहे. सुर्वे समिती अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील निर्णय घेता येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी भीमा या तुटीचे खोऱ्यातील असून या खोऱ्यातील बहुतांश भाग दुष्काळग्रस्त आहे.
तसेच वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाण्याचे प्रमाण कमी करून ते पाणी पुन्हा पूर्वेकडे वळविण्याकरिता उपाययोजनांसाठी समिती नेमलेली आहे. टाटा प्रकल्पांसाठी मागील 90 वर्षांपासून मुळशी, लोणावळा, वळवण, शिरवटा, सोमवाडी आणि ठोकरवाडी या धरणांमधून दरवर्षी 42.50 टीएमसी पाणी पश्चिमेकडे वळविण्यात येऊन वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. टाटा जलविद्युत प्रकल्पातून वळविण्यात येणारे पाणी पुन्हा भीमा खोऱ्यातील दुष्काळी भागांना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.