मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दोन वेळा चर्चा केल्याची माहिती आहे. त्यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. मात्र राज यांच्या प्रकृतीविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात दोन्ही नेत्यांत तिनदा चर्चा झाल्याचा दावा काही सूत्रांनी केला होता.
तसेच शिंदे गटाला अपात्रतेची टांगती तलवार टाळायची असेल तर मनसेत विलीन व्हावे लागेल असा कथित टोमण शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी मारला होता. मात्र आता राज- शिंदे चर्चेनंतर खरेच असे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच खरेच असे होऊ शकते का, याचीही चाचपणी घेतली जाते आहे.
काय होऊ शकते?
शिंदे गटाकडे आज जरी संख्या जास्त असली तरी शिवसेनेतून बाहेर पडत आपत्रता टाळणे त्यांच्यासाठी एवढे सोपे नाही. तसेच वेगळा पक्ष स्थापन करून तातडीने स्वत:ची ओळख निर्माण करणेही तेवढे सोपे नाही. अशा वेळी राज यांचा मनसे त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कारण शिंदे आणि राज स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची विचारधारा मानणारे आहेत.
भारतीय जनता पार्टीला राज्यात सरकार स्थापन करण्याची घाई झाली आहे. शिंदे गटामुळे भाजपकडे बहुमताचा आकडाही सहज येतो. मात्र आता तातडीने शिंदेंना आपल्यात सहभागी करून घेतले तर शिवसेना फोडीचा ठपका भाजपवरच येऊ शकतो. ते भाजपला सध्या तरी नको आहे. अशा स्थितीत मनसेवाटे भाजपला पाठिंबा हा एक पर्याय योग्य ठरू शकतो.
मनसे आणि शिंदे यांच्या एकत्र येण्याबाबत अद्याप दोन्ही बाजूंनी अधिकृतपणे कोणी काही बोलले नसले तरी दोन्ही बाजूंनी ही शक्यता सरसकट फेटाळून लावलेली नाही हे विशेष.
दोन्ही गटांचा बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर विश्वास असल्यामुळे शिवसैनिकांच्या कथित असंतोषाची धारही त्यामुळे बोथट होऊ शकते.
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने शब्द मोडला. त्यामुळे जर राज यांच्या मनसेचे पुनरूज्जिवन झाले आणि त्या पक्षाची ताकद वाढली तर भाजपसाठी ती शुभवार्ताच असणार आहे.
राज्यातील काही प्रमुख महापालिकांच्या निवडणुका पुढच्या दोन महिन्यांत होणार आहेत. भाजपची राज यांच्याशी जागावाटपाची बोलणी सुरू असल्याचे दावे केले जात आहेत. अशात जर शिंदे राज यांच्यासोबत आले तर एकूणच भाजपची ताकद वाढणार आहे. शिवसेनेचे आव्हान संपले तर राज्यात भाजपच सगळ्यांत प्रबळ पक्ष ठरू शकतो.
आम्ही पुढचे दोन तीन दिवसच राज्यात विरोधी पक्ष असू असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. त्यामुळे भाजपने निश्चितच योजना तयार केली असल्याचे मानले जात आहे. त्यात शिंदे आणि मनसे फॅक्टर अर्थातच महत्वाचा असणार आहे.