नवी दिल्ली – भारताच्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असलेल्या गायीला “राष्ट्रीय पशू’म्हणून मान्यता देण्याचा विचार केला जातो आहे का, असा प्रश्न भाजपच्याच एका खासदाराने लोकसभेमध्ये केंद्र सरकारला विचारला आहे. मात्र त्यावर सरकारच्यावतीने कोणतेही थेट उत्तर देण्यात आलेले नाही. अजमेरचे खासदार भगिरथ चौधरी यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांना लोकसभेमध्ये आज हा लेखी प्रश्न विचारला. मात्र त्यावर मंत्र्यांकडून कोणतेही थेट उत्तर देण्यात आले नाही.
चौधरी यांनी या अनुषंगाने अनेक प्रश्नांची मालिकाच मंत्र्यांपुढे मांडली आहे. त्यामध्ये संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान असलेल्या गोमातेला राष्ट्रीय पशू म्हणून मान्यता दिली जाणार आहे का? देशाच्या संस्कृतीचे आणि सनातन परंपरेचे रक्षण करण्यासाठी संसदेमध्ये एखादे विधेयक मांडले जाणार आहे का? आणि जर असेल त्याचे तपशील देण्यात यावेत, असे खासदार चौधीरी यांनी म्हटले आहे.
या प्रश्नांना केंद्रीय पशू संवर्धन आणा सासंस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी लेखी उत्तर दिले आहे. पशूपालन विभागांतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार केंद्र आणि राज्य सरकारांमधील अधिकारांच्या विभाजनांतर्गत पशू संवर्धनाचा विषय राज्यांच्या अख्त्यारित येतो. त्यामुळे या संदर्भात राज्यांकडे कायदा करण्याचा अधिकार आहे. देशी पशूंच्या संवर्धनासाठी पशू संवर्धन विभागांतर्गत राष्ट्रीय गोकुळ मिशन राबवले जाते. पशूपालन विभागांतर्गत पशू कल्याण मंडळाची स्थापनाही केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अलाहबाद उच्च न्यायालय आणि राज्साथन उच्च न्यायालयानेही गौमातेला राष्ट्रीय पशू म्हणून मान्यता देण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश दिल्याची आठवण चौधरी यांनी करून दिली. मात्र वाघ हा देशाचा राष्ट्रीय पशू आणि मोर हा देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र गायीला राष्ट्रीय पशू म्हणून मान्यता देण्याच्या अनुषंगाने कोणतेही थेट भाष्य करणे टाळले.