अहमदाबाद -कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन निश्चित मानले जात आहे. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ गुजरातमधून होण्याची शक्यताही बळावली आहे.
राहुल यांच्या यात्रेने कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आता लोकसभा निवडणुकीआधी त्या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याबाबत कॉंग्रेसने अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, यात्रेचा दुसरा टप्पा होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
अशात कॉंग्रेसच्या गुजरात शाखेने महत्वाची माहिती दिली आहे. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ गुजरातमधून करावा असा प्रस्ताव राहुल यांना देण्यात आल्याचे प्रदेश कॉंग्रेसकडून सांगण्यात आले. गुजरात ही महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांची भूमी आहे. त्यामुळे तसा प्रस्ताव देण्यात आल्याचेही प्रदेश कॉंग्रेसने म्हटले.
मात्र, गुजरात कॉंग्रेसच्या प्रस्तावाकडे राजकीय विश्लेषक वेगळ्या अंगाने पाहत आहेत. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य आहे.
त्यामुळे भाजपला राजकीय शह देण्याच्या उद्देशातून यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ गुजरातमधून करण्याची योजना कॉंग्रेसची असावी, असे त्या विश्लेषकांना वाटत आहे.