– विजय लाड
कोयनानगर – कोयना व चांदोली अभयारण्य परिसरातील लोकवस्तीलगत वन्यप्राण्यांच्या वावराने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोयना भागातील रासाटी येथे रानगव्यांच्या कळपाने वन्यजीव विभागाचे कार्यालय आणि अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या परिसराला आपले आश्रयस्थान बनवले आहे. रानगवे येथील शेतीचे मोठे नुकसान करत आहे. परंतु वन्यजीव विभाग गांधारीच्या भूमिकेत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
कोयना व चांदोली अभयारण्य क्षेत्रात अनेकदा वन्यप्राण्यांकडून माणसांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. या भागातील जनता वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली वावरत आहे. कोयना परिसरात बिबट्या दिवसाढवळ्या शेळ्या-मेंढ्या फस्त करत असून, चांदोली अभयारण्य क्षेत्रात रानगवे शेतीचे नुकसान करत आहेत.
यावर ठोस उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा अभाव असून, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. वन्यप्राण्यांचे माणसांवरील हल्ले, शेतीचे नुकसान ही नित्याची बाब बनल्याने या भागातील जनता मेटाकुटीला आली आहे. कोयना अभयारण्यातील वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊन धुमाकूळ घालत असून, व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी काय करतात, असा प्रश्न जनतेला पडला आहे.
नुकसान भरपाईबाबत “ब्र’ शब्द नाही
रानगव्यांचा कळप रासाटीमध्ये गतवर्षापासून मुक्कामी आहे. या कळपाला हुसकावून लावण्याऐवजी वन्यजीव विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे परिसरातील शेती धोक्यात आली आहे. शेतीच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत वन्यजीव विभाग “ब्र’ शब्द काढत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.