गराडे- राज्यमंत्र्यांनी लोकांची सहानभूती मिळवून सलग 10 वर्षे तालुक्याची सत्ता ताब्यात ठेवली. या काळात त्यांनी लोकांची केवळ फसवणूक केली, पाणी आणण्याचे स्वप्न दाखवले, रायताचे स्वप्न दाखवलं, विमानतळ, गुंजवणी यांचे पाणी आणण्याचे दरवर्षी फक्त जाहीर केले; मात्र काहीच करता आले नाही. आणि आता म्हणतात मला कॅबिनेट मंत्रिपद मिळण्यासाठी पुन्हा एकदा निवडून द्या. पण तुम्हाला जनतेने सलग दोनवेळा निवडून दिले, त्यावेळी एकही काम करता आले नाही. मग कॅनिबेट पद काय स्वतःचे कारखाने दुसऱ्या जिल्ह्यात सुरू करण्यासठी हवे आहे का? असा जाहीर सवाल कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी विजय शिवतारे यांना केला आहे.
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगातप यांची भिवरी येथे प्रचारसभा झाली त्यावेळी त्यांनी शिवतारे यांच्यावर टीकेची झोड उठवली. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, शामकांत भिंताडे, दत्तात्रय झुरंगे उपस्थित होते. डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, ज्या-ज्यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीची झाली त्यावेळी राजकीय क्रांती झाली आहे आणि त्यामध्ये ज्यावेळी फूट पडली, त्यावेळी विरोधकांचा फायदा झाला आहे. त्यामुळे यावेळी झालेली आघाडी विरोधकांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.