लखनऊ : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधात उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या हिंसाचारात एका आठ वर्षीय मुलासह 14 जणांचा मृत्यू झाला. मिरतमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. संभल, बिजोर आणि कानपूरमध्ये प्रत्येकी दोन तर लखनऊ, फिरोझाबाद आणि मुझफ्फराबाद येथे प्रत्येकी एक जण मरण पावला.
वाराणसी येथे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावाचा लाठीमार करताना केलेल्या पाठलागाच्या धावपळीत एका आठ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले. तत्पुर्वी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील 15 जिल्ह्यात हिंसाचार उफाळला होता. निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यापैकी काही जणांनी गोळीबारही केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
राज्याच्या काही भागात पोलिसांनी शनिवारीही लाठीमार केला. तर काही ठिकाणी पोलिसांनी निदर्शकांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. संपूर्ण राज्यभर जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.गझीयाबाद, लखनऊ, बरेली, मुझफ्फराबाद आदी ठिकाणी इंटरनटसेवा बंद ठेवण्यात आली आहे.