मुंबई – श्रीनगरच्या लाल चौकात काही युवक राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांना का रोखले गेले असा सवाल शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला विचारला आहे. आपल्या पक्षाच्या मुखपत्रातील अग्रलेखात त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.
कलम 370 रद्द केल्याने काश्मीर बदलला असल्याचा दावा केला जात आहे. मग काश्मिरात नेमकं बदललं काय गेलं आहे, असाही प्रश्न शिवसेनने उपस्थित केला आहे.
काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील भाजपच्या तीन कार्यकर्त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न सोमवारी केला होता. त्यावेळी त्यांना सुरक्षा जवानांनी रोखले तसेच त्यांना ताब्यातही घेण्यात आले होते.
मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या नकली मर्दानीला केंद्र सरकार सुरक्षा देते आहे आणि दुसरीकडे श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मात्र जेलमध्ये टाकले जात आहे. या युवकांना लाल चौकात राष्ट्रध्वज लावण्यास का रोखले गेले, असा सवाल शिवसेनेने मोदी सरकारला विचारला आहे.
याचा अर्थ काश्मिरातील स्थिती अजून सुधारलेली नाही असाच घ्यायचा काय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काश्मिरात तिरंगा का फडकावू दिला नाही याबद्दल आता त्या अभिनेत्रीने आपला राग व्यक्त करावा, असेही शिवसेनेने कंगनाला तिचे नाव न घेता सुचवले आहे.