मुंबई : गेल्या काही महिन्यांपासन मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रस्तावित असलेल्या कांजूरमार्ग येथील जागेवरून सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अशातच सध्या हे प्रकरण न्यायालयातही गेलं आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. तसेच केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी?,” असा सवालही त्यांनी यावेळी विरोधकांना केला.
“मेट्रोसाठी आपल्याला स्टेंबलिंग लाईनची आपल्याला आवश्यकता आहे. पहिल्या प्रकल्पात स्टेंबलिंग लाईनचा प्रस्ताव नव्हता हे पाहून मला धक्का बसला. आरेमध्ये आपण पर्यावरण वाचवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्तीही आपण वाढवली. कांजूरमार्गला आपल्याला ४० हेक्टर जागा मिळली होती. काजूरमार्गची जागा ओसाड आहे. कांजूरमार्गला मेट्रोच्या ३,४ आणि ६ या मार्गिकेंच्या कारशेड करता येणार होणार होत्या. यात एक मोठा फरक आहे. जिकडे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होती तिकडे अन्य लाईनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.
मुंबईच्या महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.“आरे कारशेड मेट्रो ३ साठी करत होतो. त्या ठिकाणी ३० हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी ५ हेक्टर जागेमध्ये घनदाट जंगल होतं. उर्वरित २५ हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यानंतर आपल्याला जंगल मारत मारत ही जागा कमी वाढवावी लागली असती. म्हणून त्या ठिकाणी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
“आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. परंतु काजूरमध्ये केल्यास त्याचा वापर पुढच्या ४० वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे. आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.