मेलबर्न – भारतीय संघाचा अनुभवी ऑफस्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन सातत्याने सरस कामगिरी करत असतानाही त्याचे संघातील स्थान कधीच का निश्चित नसते. तो एखाद्या सामन्यात जरी अपयशी ठरला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. मात्र, हाच न्याय अन्य खेळाडूंच्या बाबतीत का लावला जात नाही, असा खरमरीत सवाल विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी केला आहे.
अश्विनवर गेले काही वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे. त्याला 2017 पासून एकदाही एकदिवसीय व टी-20 सामन्यात संधी का देण्यात आली नाही. साडेतीनशे बळी घेतलेल्या अश्विनसारख्या गोलंदाजाला कोणताही संघ बाहेर बसवणार नाही. त्याने उपयुक्त फलंदाजीही केली आहे. त्याच्याकडे गुणवत्ता आहे, सातत्याने सरस कामगिरी केली आहे. मात्र, निवड समिती त्याच्याबाबत अनेकदा अनाकलनीय निर्णय का घेते याचेही आश्चर्य वाटते, असा टोलाही गावसकर यांनी लगावला आहे.
स्पष्टवक्तेपणामुळे नुकसान
अश्विनला कामगिरीमुळे नाही तर तो संघाच्या बैठकीमध्ये आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करतो, त्यामुळे त्याला संघाबाहेर बसवले जाते. जर अश्विनसारखा अनुभवी खेळाडू आपले मत व्यक्त करत असेल किंवा कोणता सल्ला देत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. पण भारतीय संघात मात्र तसे होताना दिसत नाही. कारण अश्विन संघाच्या बैठकीमध्ये आपले मत व्यक्त करतो आणि त्यामुळेच त्याला संघाबाहेर केले जाते. पण जो फलंदाज अपयशी ठरतो, त्याला मात्र हा न्याय लावला जात नाही, अशा शब्दात गावसकर यांनी निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत.