नवी दिल्ली – मणिपूरमध्ये लोकसभा निवडणूक २०२४ च्या मतदानाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, परंतु राज्यात ना राजकीय पक्षांचे पोस्टर दिसत आहेत, ना मोठमोठ्या रॅली होतात ना नेत्यांच्या हालचाली दिसत आहेत. निवडणुकांच्या नावाखाली, राज्यात स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी लावलेले काही होर्डिंग्जच दिसत आहेत, ज्याद्वारे लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पण निवडणुकीच्या शांततेच्या वातावरणात राजकीय पक्षांचे प्रमुख नेते प्रचारासाठी राज्यात येण्याचे टाळत आहेत. अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने येथे भेट दिली नाही
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसारख्या प्रमुख व्यक्तींची स्टार प्रचारक म्हणून यादी केली आहे, तर काँग्रेसच्या प्रचारकांच्या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. अद्याप कोणीही मणिपूरला भेट दिली नाही. मणिपूर निवडणूक आयोगाने म्हटले आहे की प्रचाराच्या मोहिमांवर कसलीही अधिकृत बंदी नाही. तरीही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी राज्यातील नाजूक परिस्थिती बिघडू नये म्हणून कमी प्रचार करत आहेत. मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रदीप झा म्हणाले, निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. आदर्श आचारसंहितेच्या कक्षेत येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला परवानगी आहे.
कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, भाजपचे उमेदवार थौनाओजम बसंत कुमार सिंग, काँग्रेसचे अंगोमचा बिमोल अकोइजम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महेश्वर थौनाओजम आणि मणिपूर पीपल्स पार्टी (एमपीपी) समर्थित राजमुकर सोमेंद्रो सिंग यांनी अनोखे उपाय केले आहेत. ते अपारंपारिक मार्गांनी मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, ज्यात त्यांच्या निवासस्थानी किंवा पक्ष कार्यालयात सभा घेणे आणि समर्थकांच्या घरोघरी प्रचार करणे समाविष्ट आहे.
घरोघरी प्रचारासाठी स्वयंसेवकांची टीम तैनात करणारे महेश्वर थौनाओजम म्हणाले, मी जाहीर सभांना संबोधित केले असते आणि रॅली काढली असती तर बरे झाले असते, परंतु मी प्रचार मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या परिस्थितीत मतदारांना त्यांच्या मताचे महत्त्व कळले असून ते शहाणपणाने निवड करतील.
राज्याचे मावळते शिक्षण आणि कायदा मंत्री बसंत कुमार सिंह यावेळी लोकसभा निवडणूक लढवत आहेत. ते त्यांच्या निवासस्थानी आणि पक्ष कार्यालयात छोट्या बैठका घेत आहेत. त्याचप्रमाणे, दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक अकोइझम बहुतेकदा त्यांच्या निवासस्थानी लोकांना भेटतात. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा आणि अकोइझमच्या समर्थनार्थ इंफाळमधील काँग्रेस कार्यालयात पोस्टर लावण्यात आले आहेत.
भाजप मणिपूर युनिटचे अध्यक्ष ए. शारदा देवी म्हणाल्या, निवडणुका आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण दिखाऊपणा करून लोकांच्या जखमेवर मीठ चोळता येणार नाही. निवडणुका याही एखाद्या सणाप्रमाणे असतात, पण सध्याच्या परिस्थितीमुळे आपण सण उत्साहात साजरा करू शकत नाही. लोक त्यांच्या घरापासून दूर राहत आहेत, त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा अशी आमची इच्छा आहे, आम्ही प्रचार करत नसलो तरी.
मणिपूरमध्ये १९ आणि २६ एप्रिल रोजी दोन टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीने विस्थापित लोकसंख्येच्या मतदान व्यवस्थेकडे लक्ष वेधले आहे. मदत शिबिरांमध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात येत आहे. उमेदवारांनी अद्याप या मदत छावण्यांना भेट दिली नाही.