मंचर -श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात पर्यटक आणि भाविकाची गर्दी वाढली असून, करोनाचा संसर्ग वाढल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. छुप्या मार्गाने येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी बंदी असतानाही अनेक भाविक पोलिसांची नजर चुकवून लपून-छपून देवाच्या दर्शनासाठी, पर्यटनासाठी येत आहेत. या भाविकांमुळे पोलीस प्रशासनाचा ताण वाढला आहे. सध्या करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व पर्यटनस्थळी कलम 144 लागू केले आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर, डिंभे धरण, कोंढवळ धबधबा, आहुपे इत्यादी ठिकाणी जाण्यास किंवा लोकांनी एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. अशा ठिकाणी जिल्हाधिकारी यांचा आदेश मोडून येणार्या नागरिकांवर पोलीस गुन्हे दाखल करीत आहेत.
आतापर्यंत 1 हजार 20 केसेस दाखल झाल्या असून भाविक आणि पर्यटकांकडून 3 लाख 33 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे; मात्र हिंदुचा पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यात श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी अनेक परराज्यातील,
शहरातील भाविक रात्रीच्या वेळी, पहाटेच्या वेळी पोलिसांची नजर चुकवून लपून-छपून भीमाशंकर परिसरात येत आहेत. तसेच काही भाविक खांडस मार्गे शिडीघाट व बैलघाटमार्गे कोकणातून येत असल्याने पोलीस प्रशासनही त्रस्त झाले आहे. सध्या राज्यावर करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट असून त्यादृष्टीने मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. तसेच पोलिसांनी अनेक ठिकाणी चेकपोस्ट लावले आहेत.
भीमाशंकर हॉटस्पॉट होण्यापासून वाचवा
सध्या पावसाळा सुरु असून आदिवासी भागातील बहुतांशी गावे दुर्गम भागात आहेत. येथे रस्ते व इतर सुविधा नाहीत. त्यात सतत पडणारा पाऊस असे असताना जर या भाविकांमुळे करोनाचा फैलाव झाला तर करोनाचे रुग्ण शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे अवघड होईल.
त्यामुळे आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढेल. प्रशासनाने वेळीच भाविकांवर योग्य ती कारवाई करावी व भीमाशंकर परिसर करोना हॉटस्पॉट होण्यापासून वाचवावा. अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.