महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर रात्री 8 पर्यंत हा महाराष्ट्र कोणाचा हे स्पष्ट होणार आहे. विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर विविध वाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीलाच पुन्हा सत्ता मिळेल, असा अंदाज व्यक्त केला असला तरी आजच्या एक्झिट पोलमध्ये कोणता निकाल समोर येतो हे महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जाहीर करण्यात आलेल्या एक्झिट पोलचे निष्कर्ष आणि प्रत्यक्षातील मतमोजणीच्या निकालात खूप तफावत होती. उत्तर प्रदेशात भाजपचे पानिपत होईल असा अंदाज व्यक्त केला होता पण तसे झाले नाही हा अनुभव पाहता विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे निष्कर्ष कोणी किती गांभीर्याने घ्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे लागेल.
वाहिन्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे सत्ताधारी भाजप महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्या तरी खरी स्थिती आज समोर येणार आहे. अर्थात महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळण्याबाबत अनेकांचा आक्षेप असला तरी राज्यात महायुतीच पुन्हा सत्तेवर येणार याबाबत बहुतेकांना शंका नाही. महायुती जागांचे द्विशतक पूर्ण करते की नाही एवढीच उत्सुकता बाकी असल्याचे अनेकांचे मत आहे. असे सर्व अंदाज, मते आणि चाचण्यांचे निष्कर्ष यावर आज पडदा पडणार आहे आणि राज्यातील कोट्यवधी मतदारांनी हा महाराष्ट्र कोणाच्या स्वाधीन केला हे समजणार आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 2014 च्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळवून स्वबळावर बहुमत मिळवले असल्याने राज्यातही तसेच होईल अशी अशा भाजपला वाटत असेल तर यात चुकीचे काही नाही.
राज्यातील 288 जागांपैकी तब्बल 164 जागा लढवण्यामागे भाजपचा हाच हेतू होता; पण या 164 जागांपैकी 144 ते 150 जागा भाजप जिंकू शकेल का हाच खरा प्रश्न आहे. गेल्यावेळी भाजपने 288 जागा लढून 123 ठिकाणी विजय मिळवला होता त्यामुळे 164 जागा लढून 150 जागा जिंकणे केवळ अशक्य वाटते. आपल्या पूर्वीच्याच जागा राखून त्यात 8 ते 10 जागांची भर भाजपने घातली तरी खूप झाले. शिवसेना जागांचे शतक गाठेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे; पण गेल्यावेळी जिंकलेल्या 63 जागांमध्ये शिवसेना 35 ते 40 जागांची भर घालेल, असेही वाटत नाही. त्यामुळेच भाजप आणि शिवसेना यांनी आपल्या पूर्वीच्या जागा कायम राखल्या तरी महायुती 190 पर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त होत आहे. अर्थात विरोधी पक्ष पूर्णपणे निष्प्रभ ठरतील या गृहितावर हा अंदाज आधारित आहे पण तशी स्थिती नव्हती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अनेक महत्त्वाचे नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाल्याने या दोन्ही पक्षांना थोडाफार फटका बसला हे खरे असले तरी या पक्षांचे आव्हान एकदमच संपुष्टात आले होते, असं म्हणता येत नाही.
कॉंग्रेस पक्ष या निवडणुकीत पूर्णपणे मरगळला असला तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निवडणुकीत जान आणली होती. वयाच्या 80 व्या वर्षीही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून त्यांनी आक्रमक प्रचार केला होता. सातारा येथील शेवटच्या प्रचार सभेत भर पावसात भाषण करून त्यांनी चांगली वातावरणनिर्मिती केली होती. साहजिकच याचा फायदा त्यांच्या आघाडीला होणारच नाही, असं म्हणता येणार नाही. शरद पवार यांना या प्रचारात कॉंग्रेसची साथ तेवढी मिळाली नाही हेही वास्तव आहे. एक्झिट पोलमध्ये कॉंग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव दाखवण्यात येत आहे याचे कारण तेच आहे. चेहराहीन पद्धतीने कॉंग्रेसने ही निवडणूक लढली असल्याने त्याचा फटका त्यांना बसला तर आश्चर्य वाटायला नको. राहुल गांधी यांनी नावापूरत्या राज्यात पाच सभा घेतल्या त्यात कोठेही कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा फुंकण्याचे काम झाले नाही. एकट्या शरद पवार यांनी केलेल्या प्रचाराच्या जोरावर कॉंग्रेस आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचता येईल का, याचेही उत्तर आज मिळणार आहे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीला बंडखोरांचे मोठे आव्हान होते. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना यांचेच उमेदवार समोरासमोर होते. निवडून येणारे बंडखोर अखेर आपल्या मूळ पक्षाकडेच जातात असा आजवरचा अनुभव असला तरी त्यामुळेही महायुतीचा अधिकृत द्विशतकी आकडा गाठण्यात अडचणी येऊ शकतात. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत मोठी मते घेतली होती तो फॅक्टरही महत्त्वाचा ठरणार आहे. एमआयएम हा पक्षही स्वबळावर रिंगणात होता त्याचा परिणामही होणार आहे. यावेळी निवडणूक रिंगणात उतरलेल्या राज ठाकरे यांनीही मुद्द्यावर आधारित प्रचार करून चांगली वातावरण निर्मिती केली होती त्याचा परिणाम काय होतो हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. आजच्या मतमोजणीचे महत्त्व काही व्यक्तींसाठीही खूप आहे. निवडणुकीच्या राजकारणात उतरलेले ठाकरे घराण्यातील पहिले नेते आदित्य ठाकरे यांना मतदार कसा आणि किती प्रतिसाद देतात हे आज समजणार आहे. आतापर्यंत विधानपरिषदेच्या माध्यमातून राजकारण करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रथमच विधानसभा निवडणूक लढवत आहेत.
तेही स्वतःचा कोल्हापूर जिल्हा सोडून पुणे जिल्ह्यातून. मतदार त्यांना कसा प्रतिसाद देतात हेही महत्त्वाचे आहे. सातारच्या लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले बाजी मारतात का हा एक औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. मराठवाड्यात परळी विधानसभा मतदार भावाच्या पाठीशी राहतात की बहिणीच्या पाठीशी राहतात हेही आज समजणार आहे. मी पुन्हा येईन अशी आत्मविश्वासपूर्वक घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या घोषणेला आव्हान देऊन मैदानात उतरणारे शरद पवार यांच्यापैकी कोणाच्या हातात महाराष्ट्र देण्याचा निर्णय मतदारांनी घेतला आहे हे आज समजेल. अनेक अर्थांनी आजचा निकाल महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे यात शंका नाही.