एकीकडे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी याच्या नेतृत्वाखाली “भारत जोडो’ यात्रेस जबरदस्त प्रतिसाद मिळत असतानाच, दुसरीकडे 137 वर्षे जुन्या असलेल्या कॉंग्रेस पक्षात 17 ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. गेली तीन वर्षे पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसून, 2000 सालानंतर खऱ्या अर्थाने पक्षाध्यक्षाची निवडणूक प्रथमच होत आहे. कॉंग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरण पाच सदस्यांचे असून, पक्षाचे सरचिटणीस आणि गांधी कुटुंबीयांच्या विश्वासातील वयोवृद्ध नेते मधुसुदन मिस्त्री त्याचे नेतृत्व करत आहेत.
लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांत झालेले पराभव, विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांतील धक्कादायक निकाल, बड्या नेत्यांमागील चौकशीचा ससेमिरा, यामुळे पक्षात नैराश्य व शैथिल्य आले आहे. त्यात आता गुजरात, हिमाचल आणि हरियाणा राज्यांच्या विधानसभा निवडणुका आल्या असून, दीड वर्षांनंतर लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशावेळी पक्षाला खंबीर नेतृत्वाची गरज असून, गांधी कुटुंबीयांनी ही निवडणूक न लढवण्याचे अगोदरच जाहीर केले होते. आता अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होणार असून, या निवडणुकीच्या निमित्ताने का होईना, कॉंग्रेस पक्ष देशात चर्चेत आला आहे, हेही नसे थोडके. कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत भाजपने टीकाटिप्पणी सुरू केली असली, तरी भाजपमध्येही अध्यक्षपदाचा निकाल हा मॅचफिक्सिंगद्वारेच लागतो, हे गुपित नाही. खर्गे हे अनेकदा निवडणुका लढवलेले आणि त्यात विजयी झालेले उमेदवार असून, त्यांचा अनुभव मोठा आहे. उलट, शशी थरूर हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विचारवंत व लेखक असून, यूनोमध्ये काम करण्याचाही त्यांना अनुभव आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात परराष्ट्रखात्यात त्यांनी आपली छाप सोडली आणि ते लोकसभेवरही तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. “कॉंग्रेसला जुने हवे असेल, तर खर्गेंना मत द्या आणि बदल हवा असेल, तर मी उभा आहे’, असे उद्गार थरूर यांनी काढले आहेत.
17 ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीनंतर जो कोणी पक्षाध्यक्ष होईल, तो गांधी घराण्याला अलविदा म्हणण्याचा मूर्खपणा करणार नाही. याचे कारण, हे घराणे हे आमच्यासाठी मौलिक संपत्ती आहे, असा युक्तिवाद करून थरूर यांनी आपणही बंडखोर नसून, निष्ठावंतच असल्याचे चित्र निर्माण केले आहे. तर कॉंग्रेसची विशाल संघटना चालवण्यासाठी गांधी कुटुंबीयांचे मार्गदर्शन पाहिजेच, असे प्रतिपादन खर्गे यांनी केले आहे. पक्षाध्यक्षपदाची निवडणूक एकमताने व्हावी, असे मत त्यांनी मांडले असले, तरीदेखील निवडणूक होत आहे, हीच चांगली गोष्ट आहे. याचे कारण, निवडणूक ही पक्षांतर्गत लोकशाहीला पोषक अशी बाब असते. पक्षात तरुणांना आणणे व जुन्या लोकांना निवृत्त करण्यासाठी वयोमर्यादा लागू करणे, या गोष्टी पक्षाध्यक्ष म्हणून राबवू, असे खर्गे यांनी म्हटले असले, तरी हा एक विनोदच म्हटला पाहिजे. आधी त्यांनीच निवृत्त होऊन तरुण नेत्यांना जागा करून देण्याची गरज होती. खर्गे यांच्या नेतृत्वात प्रेरणादायी असे काहीच नाही. या उलट, थरूर यांनी पक्षातील अधिकारांचे विकेंद्रीकरण करणे, राज्यातील नेतृत्वास विश्वासात घेऊन काम करणे आणि जनतेपुढे सकारात्मक व कल्पक कार्यक्रम ठेवणे, हे मुद्दे मांडले असून, हे नक्कीच स्वागतार्ह आहे.
मुळात पक्षाध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव होते; परंतु तेथील मुख्यमंत्रिपद सोडायचे नसल्यामुळे, पक्षाध्यक्षपदाच्या रिंगणातून त्यांनी माघार घेतली. गेहलोत हे गांधी घराण्याचे उमेदवार आहेत, असे मानले जात होते. त्यानंतर कमलनाथ यांचे नाव पुढे आले. परंतु मध्य प्रदेशमध्ये निवडणुका असून, आपल्याला तेथेच राहण्यात रस असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते मुकुल वासनिक यांना श्रेष्ठींनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का, असे विचारले. परंतु त्यांनीही नकार दिला. मग दिग्विजय सिंग यांनी मैदानात उडी घेतली. परंतु त्यांच्याऐवजी खर्गे यांच्या नावाचा पत्ता बाहेर आल्यानंतर त्यांनी माघार घेतली. गांधी घराण्याने उमेदवार म्हणून निवडणुकीत भाग न घेण्याचे ठरवले असले, तरी अजूनही पक्षात केवळ आणि केवळ त्यांचेच चालते, असे चित्र आहे. खर्गे हे सोनियाजींचे उमेदवार आहेत, असे बोलले जाऊ लागल्यानंतर, राहुलजींनी दोन्ही उमेदवार उत्तम असून, आम्ही कोणा एकाची बाजू घेत नसल्याचे सूचित केले. परंतु ते काहीही म्हणत असले तरी खर्गे हे स्वतंत्र विचाराचे नेते नसून, निष्ठावंत एवढीच त्यांची ओळख आहे. त्यांना पाच मुले असून, त्यापैकी तिघांची नावे, राहुल, प्रियांका आणि प्रियदर्शिनी अशी आहेत. या निवडणुकीत त्यांना गमावण्यासारखे काही नाही. ते पक्षाध्यक्ष झाल्यास, रबरस्टॅंपसारखे काम करतील, असा सर्वसाधारण समज आहे.
थरूर हे त्या अर्थाने टिपिकल कॉंग्रेसी नाहीत. ते अन्य क्षेत्रात होते व खूप उशिरा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. गेली काही वर्षे ते सातत्याने कॉंग्रेस पक्षाने स्वतःचा पुनर्शोध घ्यावा, संघटनेत आणि विचारात बदल घडवावे, यासाठी आग्रही राहिले आहेत. भाजपवर टीका करताना त्यांचा कधीही तोल ढळत नाही. इतर अनेक कॉंग्रेस नेत्यांप्रमाणे कोणताही अभ्यास न करता, टीका करायची म्हणून करायची, असे ते करत नाहीत. पक्षाने आत्मपरीक्षण करावे, असा त्यांनी सल्ला दिल्यावर, ते भाजपची भाषा बोलत आहेत, अशीही टीका झाली. परंतु ते खचले नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा निर्देश करून, “पचास करोड की गर्लफ्रेंडवाला मंत्री’, अशी संभावना केली होती. सुनंदा यांच्या मृत्यूनंतर थरूर यांच्यावर अनेक आरोप झाले. तपास यंत्रणा त्यांच्या मागे लागल्या आणि टीव्ही चॅनेलवाल्यांनी त्यांच्यावर सातत्याने चिखलफेक केली. तरीदेखील खचून न जाता, ते खंबीरपणे उभे राहिले. मागील दोन्ही निवडणुकांत शहरी मध्यमवर्ग आणि तरुणांनी कॉंग्रेसला नाकारले. जागतिकीकरण व उदारीकरणानंतरच्या नवीन पिढीस हे जग बदलावे, असे वाटते. त्यांच्या इच्छा-आकांक्षांना प्रतिसाद देणारे नेतृत्व कॉंग्रेसमध्ये असले पाहिजे. खर्गे यांचा विजय अपेक्षित असला, तरी उमेदवार म्हणून थरूर हे त्यांच्यापेक्षा नक्कीच सरस आहेत.