मुंबई – शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत देखील फूट (ncp split) पडली आणि अजित पवार हे भाजपसोबत (bjp) सत्तेत सामील झाले. राष्ट्रवादीतील (ncp) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली.
अशातनिवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीसाठी शरद पवार हे देखील हजर झाल्याचे पाहायला मिळाले.निवडणूक आयोगासमोरील सुनावणीमध्ये अजित पवार गटासह शरद पवार गटाकडून काही महत्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. या सर्व प्रकरणावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली. दुर्दैव आहे त्या गटाचे अनेक लोक मनात म्हणतात पवार साहेब आम्हाला विठ्ठलासारखे आहेत. मग विठ्ठलाला तुम्ही देव घरातूनच बाहेर काढणार ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती आहे. वडिलांना घरातून बाहेर काढणारं हे पहिलेच उदाहरण पाहिलं. असे वक्तव्य निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर खासदार सुळे यांनी केलं आहे.
दरम्यान, सुळे यांनी माध्यमांशी बोलतांना अजित पवार गटाला टोला लगावला त्या पुढे म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावर सुनावणी झाली. मात्र सातत्याने तो गट म्हणतो आम्हालाच चिन्ह मिळणार आहे. यांना परीक्षेस बसायच्या अगोदर निकाल माहीत आहे. त्यामुळे कुछ तो गडबड है. कोणती तरी अदृश्य शक्ती दिल्लीवरून येऊन यांच्या कानात सांगतीय. असा टोला सुळे लगावला आहे.
अजित पवार गटाचा आयोगासमोर युक्तिवाद
आवश्यक संख्याबळ आमच्याकडे आहे.
जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर,पक्ष घटनेचे पालन होत नाही.
विधानसभेच्या ४२ आमदार,विधान परिषदेतील ६ आमदार तर नागालँडचे सात आमदार आमच्यासोबत तर लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येकी एक खासदार आमच्यासोबत.
शरद पवारांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत मर्जीने पक्ष चालवत असल्याचा आरोप शरद पवारांवर करण्यात आला.
नऊ आमदारांवर कारवाईचं पत्र बेकायदेशीर, चिप व्हीप आमच्या बाजूने.
मुख्य प्रतोद देखील आमच्यासोबत.
कोअर कमिटीतील संख्याबळ आमच्याबाजूने.
पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळाव.
शरद पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीवर आक्षेप. निवड योग्य नाही.
शिवसेना फुटीचा दाखल देत संख्याबळ जास्त असणाऱ्यांना चिन्ह मिळालं तसेच ते आम्हाला मिळावं अशी मागणी केली.
शरद पवार गटाने मांडले महत्वाचे मुद्दे
शरद पवार गटाकडून पक्ष घटनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली.
पक्षावर अजित पवार यांचा गट दावा करू शकत नाही.
सर्वाधिकार शरद पवारांकडे त्यामुळे अजित पवार दावा करू शकत नाही.
मूळ पक्ष आमच्याकडे आहे केवळ पक्षातील एक गट बाहेर पडला आहे.
निर्णय होईपर्यंत पक्षाचं चिन्ह गोठवू नका आमच्याकडेच ठेवा.
ही कायदेशीर प्रक्रिया आहे. दोन्हही गटांना बाजू मांडण्यासाठी पूर्णपणे संधी मिळेल अशी टिपण्णी देखील यादरम्यान निवडणूक आयोगाने केल्याचे समजते. आजची सुनावणी संपली. पहिल्या दिवसाची सुनावणी संपल्यानंतर पुढील सुनावणी सोमवारी (९ ऑक्टोबर) रोजी होणार आहे.
2 जुलैला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधला अजित पवार गट सत्तेत सामिल झाला. दुसरीकडे शरद पवार गटाने विरोधी पक्षात राहणार असल्याचं जाहीर केलं.त्यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाला पत्र देऊन पक्षाध्यक्ष पदी अजित पवारांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यानंतर आज पहिल्यांदाच निवडणूक आयोगात सुनावणी सुरु झाली.यावेळी शरद पवारांसह त्यांचे वकील देखील हजर होते.