नवी दिल्ली – कोणत्या दोन बॅंकांचे खासगीकरण करायचे या बॅंकांची यादी नीती आयोगाने निर्गुंतवणूक संदर्भातील सचिव गटाकडे सादर केली आहे. दोन बॅंका आणि एक विमा कंपनीचे नाव सुचवण्याचे अधिकार निती आयोगाला देण्यात आले आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात या आर्थिक वर्षामध्ये दोन बॅंक आणि एका विमा कंपनीचे खासगीकरण करण्यात येईल असे सांगितले आहे. निती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सर्व बाबींचा अभ्यास करून आम्ही यादी सादर केली आहे. सचिव गटाने या यादीला मंजुरी दिल्यानंतर ही यादी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.
त्यानंतर खासगीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. ज्या बॅंकांचे खाजगीकरण करण्यात येईल त्या बॅंकातील कर्मचाऱ्यांची सर्व काळजी घेतली जाईल असे आश्वासन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले आहे.
सरकारने बराच विचार करून बॅंकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये मोठ्या बॅंकांची आवश्यकता वाढली आहे. कारण अर्थव्यवस्था वाढत आहे. त्यामुळे छोट्या बॅंकांचे एकीकरण करून किंवा सरकारी बॅंकांचे खासगीकरण करून ही गरज भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.