अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकरांचा सवाल
“जवाब दो’ आंदोलन मंगळवारी
शहरातील विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे दि.19 रोजी सायंकाळी 7 वाजता कॅन्डल मार्चद्वारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन केले जाणार आहे. तर, दि.20 रोजी सकाळी 9 वाजता “सूत्रधार केव्हा पकडणार? जबाब दो’ हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच सूत्रधारांना अटक केली नाही, म्हणून केवळ निषेध न नोंदविता कोल्हापूर आणि सांगली महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त लोकांना मदत करून सकारात्मक पद्धतीने आंदोलन केले जाणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
पुणे – डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणात उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना फटकारल्यानंतर सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना अटक केली. मात्र, या खुनामागील सूत्रधाराला कधी पकडणार? असा सवाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केला. तसेच खून प्रकरणाचा संथगतीने सुरू असलेल्या तपासाबाबत खंत व्यक्त केली.
साधना मीडिया सेंटर येथे शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदीनी जाधव, पुणे शहर अध्यक्ष श्रीपाल ललवाणी उपस्थित होते. डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, “डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासातून आणि आजपर्यंत दाखल झालेल्या आरोपपत्रांमध्ये हे चारही खून एका सामाईक उद्दिष्टाने आणि एकाच विशिष्ट कट्टरपंथीय संघटनेच्या लोकांकडून झाल्याचे पुढे आले आहे. असे असतानादेखील शासन या संघटनांविषयी ठोस कारवाई करताना दिसत नाही, ही निषेधार्ह बाब आहे. जोपर्यंत सूत्रधार मोकाट आहेत, तो पर्यंत विवेकवादी लोकांना धोका कायम आहे, असेही ते म्हणाले.